भडगाव तालुक्यातील गुढे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्री संत सावता महाराज पंच कमिटीचे सदस्य श्रावण श्रीधर माळी यांचे सर्वात लहान चिरंजीव राहुल श्रावण माळी हे भारतीय सैन्य दलात होते. राहुल माळी हे १४ वर्षापासून सैन्य दलात सेवा बजावत होते. राहुल माळी ते कुटुंबासह आर्मी सेंटरमध्ये वास्तव्यास होते. सध्या ते भारत – बांगलादेश सीमेजवळ पश्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे नायक पदावर सेवा बजावत होते. नेहमीप्रमाणे कंचनपुरा येथे सेवा बजावत असतांना मंगळवारी रात्री राहुल माळी यांना मृत्यू झाला. चक्कर येवून पडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, मात्र मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. जिल्हा सैनिक कल्याण विभागाकडून राहुल माळी यांचा अकस्मात मृत्यू झाल्याचे अधिकृत कळवण्यात आले आहे.
राहुल माळी यांना बराकपूर येथील आर्मी हॉस्पिटल येथे शवविच्छेदन करून त्यांचे पार्थिव शरीर आज नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. राहुल माळी यांच्या पश्चात पत्नी ज्योती दोन लहान मुले शिव वय वर्ष ४ व शंभु वय दीड वर्ष अशी लहान चिमुकले मुले तसेच वडील, आई व दोन मोठे भाऊ वहिनी, पुतणे असा परिवार राहुल माळी यांचे भाऊ अविनाश माळी हे प्राथमिक शिक्षक आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अविनाश माळी हे कलकत्ता येथे रवाना झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार अमृतसर येथून इंदोर व त्या ठिकाणाहून मूळगावी गुढे येथे ३० जून रोजी सकाळी राहुल माळी यांचे पार्थिव पोहचणार आहे.
कोवळ्या वयातच चिमुकल्याचं पितृछत्र हरपले…
राहुल माळी हे महिन्यापूर्वीच सुटीवर गुढे गावी घरी आले होते. या दरम्यान त्यांनी कुटुंबियांनी भेट घेतली व त्यानंतर ते पुन्हा कर्तव्यावर रूजू झाले होते. कुटुंबियांनी घेतलेली त्यांची ही भेट अखेरची ठरली आहे. घटनेची वार्ता गावात मिळाल्यावर गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे. गावात ठिकठिकाणी राहुल माळी यांच्या श्रध्दांजलीचे बॅनर लागले आहेत. ३० जून रोजी शासकीय इतमामात अविनाश माळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गुढे जुवार्डी फाट्यावर प्रत्येकाला जवान राहूल माळी यांचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी भव्य अशा मोकळ्या जागेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून यासाठी ग्रामस्थ व मित्र परिवार तयारी सुरू केली आहे. राहूल माळी यांच्या मृत्यूने त्यांची दोन्ही चिमुकल्याचे कोवळ्या पितृछत्र हरपले आहेत. घटनेने माळी परिवारावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावांवर शोककळा पसरल्याने गुढे गावासह परिसरात या वीर शहीद जवानांबाबत हळहळ व दु:ख व्यक्त केले जात आहे.