तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे विठ्ठल भक्त आहेत. दर्शनासाठी आले आहेत. त्याबाबत महाराष्ट्र सरकारने राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. बीआरएसचे राज्य प्रमुख माणिक कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही तिखट शब्दांत टीका केली आहे. राष्ट्रवादीने शेतकऱ्यांचे गळे दाबले आहेत, म्हणून राष्ट्रवादीमधील काही शेतकरी नेते बीआरएस पक्षात प्रवेश करत आहेत, असे ते म्हणाले.
व्हिआयपी दर्शन देवेंद्र फडणवीसांना का? बीआरएस नेत्यांचा सवाल
हिंदूराष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केसीआर आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांना व्हिआयपी दर्शनास विरोध केला आहे. बीआरएस नेते व प्रदेश अध्यक्ष माणिक कदम यांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांना यावरून प्रत्युत्तर दिलं आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले वारकरी हे दर्शनाचे खरे मानकरी व हकदार आहेत आणि हे आम्हाला मान्य आहे. पण व्हिआयपी दर्शन सर्वांसाठी बंद करा. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनाही व्हिआयपी दर्शन बंद करा, अशी मागणी बीआरएस नेत्यांनी केली. वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणारे हेच ते राज्य सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
‘२०१४ मध्ये स्थापन झालेल्या तेलंगणमध्ये चीन सारखी प्रगती’
महाराष्ट्र राज्य सरकारमधील आणि महाराष्ट्रातील पक्ष स्थापन करणाऱ्या नेत्यांना बीआरएसचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख बी. जे. देशमुख यांनी टोला लगावला आहे. तेलंगण राज्य २०१४ मध्ये स्थापन झालं आहे. काही वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या तेलंगणमध्ये कल्याणकारी व शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार स्थापन झाले आहे. तेलंगणमध्ये चीन सारखी प्रगती झाली आहे. पण महाराष्ट्र राज्यात आजही तशी प्रगती झाली नाही, अशी खंत व्यक्त करत राज्य सरकारवर टीका केली आहे.