अद्रकाचा दर आलेख चढताच असून १८० ते २०० रुपये किलो या दराने त्याची विक्री होत असल्याचे त्यांनी नमूद केले. लसणाच्या भावातही तेजी असून १०० ते १२० रुपये प्रति किलो असा दर आहे तर गावरान लसणाचे दर किलोमागे १६० ते १८० रुपयांच्या घरात आहे.
आवक घटल्याने टोमॅटो चांगला भाव खात आहे. काही दिवसापूर्वी २० ते २५ रुपये किलोने मिळणाऱ्या टोमॅटोसाठी ग्राहकांना सध्या ५० ते ६० रुपये मोजावे लागतात. बटाट्याचे दर स्थिर कायम असून १५ ते २० रुपये प्रती किलो दराने त्याची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. हिरवी मिरचीही चांगली कडाडली आहे. ५० रुपये प्रति किलोने मिळणाऱ्या मिरचीचे भाव ७० ते ८० रुपयांच्या घरात गेले आहेत. तर दोडकेचे भावही ७० ते ८० रुपये प्रति किलो असून ४० रुपयांना मिळणाऱ्या वांग्यासाठी ग्राहकांना ६० ते ७० रुपये मोजावे लागत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
यासह फ्लॉवर तसेच चवळी शेंगा ५० ते ६० रुपये प्रती किलो, भेंडी ३० ते ४० रुपये, दुधी भोपळा, पत्ताकोबी २० ते २५ रुपये, गवार तसेच शिमला मिरचीचे दर ४० ते ५० रुपये किलो, काकडी ४० ते ५० रुपये, कारले, शेवगा शेंगा ६० रुपये तर कांदा १० ते १२ रुपये प्रती किलो असे दर असल्याचे विक्रेत्यांनी नमूद केले. लिंबाच्या दरात किलोमागे काहीशी घसरण झाली असून ५० ते ६० रुपये दराने त्याची विक्री होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पालेभाज्याची आवक मंदावल्याने दर वधारले असून मेथी, कोथिंबीरची एक जुडी १५ ते २० रुपयांना तर पालकाच्या एका जुडीसाठी ८ ते १० रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत.