बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे ही घटना १५ जून रोजी घडली आहे. आईसोबत नळावर पाणी आणण्यासाठी जात असलेल्या तीन वर्षीय बालकाला दुचाकीने धडक दिली. या अपघातात चिमुरड्याचा जागेवरच मृत्यू झाला. पाण्याच्या टाकीपासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार घडला.
स्थानिक गजानन नगर भागातील रहिवासी कुलदीप जाधव यांची पत्नी, आपला तीन वर्षांचा मुलगा निर्वाणला घेऊन नळावर पाणी आणण्यासाठी जात होती. दरम्यान याच भागातील रहिवासी अल्टमेश अजिज खान यांनी निष्काळजीपणे व भरधाव दुचाकी चालवून चिमुकल्याला धडक दिली. त्यात निर्वाणचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत निर्वाणचे काका संदीप रमेश जाधव यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यावरून पोलिसांनी दुचाकी चालक अल्टमेश अजीज खान यांच्या विरुद्ध कलम २७९, ३०४ अ आयपीसीसह कलम 184, 135 मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भाग असो की शहरी भाग, अनेक जणांना घरापासून बऱ्याच अंतरावर पायपीट करून पाणी आणावे लागते. घरामध्ये लहान मूल बाळ असेल, तर त्यांना एकट्याला घरी न ठेवता त्याला देखील सोबत न्यावे लागते आणि अशातच अशा प्रकारच्या काही घटना घडतात.
काही वेळा विहिरीमध्ये देखील पडून लहान मुलांचा किंवा मोठ्या व्यक्तीचा मृत्यू होतो. पाणी मिळवण्याच्या धडपडीमध्ये आपला जीव गमावून बसावे लागते. आजही अनेक ग्रामीण भागात टँकरच पाण्याचे मुख्य स्त्रोत आहेत. ते दैनंदिन जीवनाचा एक भाग झालेले आहेत.