• Sun. Mar 15th, 2026

    Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांची खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीला भेट, चर्चांना उधाण

    Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांची खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीला भेट, चर्चांना उधाण

    छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी भेट दिली. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रदेश प्रवक्ता फारुख अहमद जावेद कुरेशी तय्यब जफर युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड शहराध्यक्ष यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजी नगर येथील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात अनेकदा राजकारण रंगले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरु असताना ठाकरे गटाचा मित्रपक्ष असलेल्या वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला सदिच्छा भेट दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांची अडचण होऊ शकते.

    प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीवर काही राजकीय प्रतिक्रिया उमटतात का, हे पाहावे लागेल. मात्र, तुर्तास तरी प्रकाश आंबेडकर यांची ही कृती राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात वंचित बहूजन आघाडीच्या वतीने कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी प्रकाश आंबेडकर दोन दिवसीय संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.याच दरम्यान खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेब यांच्या काबरीला त्यांनी भेट दिली.पर्यटन स्थळ असल्याने याठिकाणी भेट दिल्याचे आंबेडकर म्हणाले. याठिकाणी असलेल्या मारुती मंदिराला मी भेट देणार आहे. या मंदिराने आम्हाला खूप मदत केली आहे. भारताच्या दृष्टिकोनातून खुलताबाद महत्त्वाचं ऐतिहासिक शहर आहे. नावावरून जो काही भांडण लावण्याचा प्रकार सुरू आहे त्यांना मी एकच सांगतो की, औरंगजेबाने पन्नास वर्ष राज्य केलं, ते कोणालाही मिटवता येणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

    राजकारणासाठी औरंगजेब ही भाजपची गरज, खासदार संजय राऊत यांची टीका

    गेल्या काही दिवसांमध्ये औरंगजेब हे राज्यातील वादाचे प्रमुख कारण ठरले आहे. अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या भागांमध्ये औरंगजेबाचा फोटो स्टेटसला ठेवल्यामुळे वाद झाला होता. अहमदनगर येथे एका मिरवणुकीत काही तरुणांनी औरंगजेबाचे फोटो झळकावले होते. त्यावरुन प्रचंड वाद निर्माण झाला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाचे फोटो झळकावणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा दिला होता. यानंतर या वादाचे लोण कोल्हापूर व राज्याच्या अन्य भागांमध्ये पसरले होते.

    शिवरायांचा शत्रू तो आपला शत्रू, औरंगजेब आपला होऊच शकत नाही; हसन मुश्रीफ

    कोल्हापूरमध्ये एका व्यक्तीने औरंगजेबाचा फोटो स्टेटसला ठेवल्यामुळे हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. हिंदू संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक देत आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने कोल्हापूरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे तब्बल तीन दिवस कोल्हापुरात कर्फ्यू लागू करण्यात आला होता. या काळात कोल्हापूरमधील इंटरनेट सेवा आणि अन्य व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना याची मोठी झळ सोसावी लागली होती. कोल्हापूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाला बरेच कष्ट घ्यावे लागले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाशी कुठल्याही प्रकारे नाव जोडले जाणे, हे राजकीयदृष्ट्या अत्यंत घातक मानले जात आहे. तरीही प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

    बाटलीतून भूत काढावं तसा हा औरंग्या तुम्ही महाराष्ट्रात आणलात; अंबादास दानवेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed