• Sun. Sep 22nd, 2024

मुंबईकरांची चिंता वाढली, पाऊस लांबल्याने BMC जूनअखेरीस घेणार हा मोठा निर्णय

मुंबईकरांची चिंता वाढली, पाऊस लांबल्याने BMC जूनअखेरीस घेणार हा मोठा निर्णय

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पाऊस लांबल्याने आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट घोंघावत आहे. मात्र जूनअखेरीस सातही धरणांचा आढावा घेऊनच पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी गुरुवारी दिली.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. या सातही धरणांतून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्याच्या घडीला २ लाख ५० हजार ६९१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. यामध्ये राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा आणि भातसा या दोन धरणांतील राखीव कोट्यातील प्रत्येकी ७५ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठाही आहे. त्यामुळे एकूण १५.६९ टक्के पाणीसाठा असून तो ४८ दिवस पुरेल, असे त्यांनी सांगितले. अप्पर वैतरणा आणि भातसा या राज्य सरकारच्या दोन धरणांतून राखीव पाणीसाठा मिळत असला तरी अन्य धरणांत पाणीसाठा कमी आहे. पाऊस लांबल्यास पाणीकपातीचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे जूनअखेरीस मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊनच पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती वेलरासू यांनी दिली.

यंदाही मुंबईत तुंबई होणार? पालिकेनं प्रयत्न केले पण प्रकल्प रखडला, पंपिंग स्टेशनच्या कामाबद्दल नवी अपडेट
पाणीसाठ्याची सद्यस्थिती

अप्पर वैतरणा : ४६ हजार ८१८ दशलक्ष लिटर (राखीव कोटा)

मोडक सागर : २८ हजार ५७८ दशलक्ष लिटर

तानसा : २८ हजार ४०० दशलक्ष लिटर
Monsoon 2023: पावसाची प्रतीक्षा आणखी एक आठवडा? पाहा काय आहे पुढील ४ आठवड्यांचा अंदाज
मध्य वैतरणा : २५ हजार ७८८ दशलक्ष लिटर

भातसा : ३७ हजार ७९२ दशलक्ष लिटर

विहार : ६ हजार ७१ दशलक्ष लिटर

तुळशी : २ हजार २५३ दशलक्ष लिटर

मान्सून आगमन लांबणीवर; मिठागरांना फायदाच फायदा, १५ जूनपर्यंत चालणार मीठ संकलन

पाणीपट्टीत वाढ नाही

पाणीपट्टीत प्रत्येक वर्षी कमाल आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यास मुंबई पालिकेने सन २०१२मध्ये मंजुरी दिली आहे. त्यानुसार, सन २०२३-२४ या वर्षासाठी मुंबई महापालिका १६ जूनपासून पाणीपट्टीत वाढ करण्याच्या विचारात होती. ही वाढ ७.१२ टक्क्यांपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पाणीपट्टीवाढीला भाजपकडून विरोध करण्यात आला होता. त्यातच पालिकेच्या जलविभागाचा खर्च आणि उत्पन्न याचा अद्यापही ताळमेळ होत नसल्याने पाणीपट्टीत तूर्तास वाढ न करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed