म. टा. वृत्तसेवा, निफाड : बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कांद्याला कमी भाव मिळत असल्याचे लक्षात येताच कांदा लिलावासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी विंचूर येथील उपबाजारात आवारात कांदा लिलाव बंद पाडले. बाजार समिती कार्यालयाला घेराव घालून संताप व्यक्त केला.कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण आहेत. अशातच लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात गुरुवारी उन्हाळ कांद्याची मोठी आवक सुरू होती. मात्र, लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याला लिलावात प्रतिक्विंटल अवघा २०० ते ५०० भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी लिलाव बंद पाडत बाजार समिती कार्यालयाला घेराव घातला. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी ३०० ते ४०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रशासनाला धारेवर धरले. बाजार समितीचे संचालक संदीप दरेकर, छबू जाधव, राजेंद्र बोरगुडे, सहाय्यक सचिव प्रकाश कुमावत यांच्यासह लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांनी मध्यस्थी करीत कांद्याचे लिलाव पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडे केली.
फेरलिलावानंतर ‘जैसे थे’
‘लिलाव झालेल्या कांद्याच्या वाहनांचे फेरलिलावात भाव न सुधारल्यास आपले आंदोलन सुरू ठेवा. मात्र, फेरलिलाव होऊन द्या,’ या तोडग्यानंतर झालेल्या फेरलिलावामध्ये २०० रुपये विक्री झालेल्या कांद्याला ३०० रुपये, तर ३०० ते ४०० रुपये विक्री झालेल्या कांद्याला कांद्याला ५०० ते ६०० रुपये भाव मिळाल्यानंतर कांदा लिलाव सुरळीत झाले. पण, संचालक मंडळ गेल्यानंतर कांद्याच्या बाजारभावाची परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सापडला राजमार्ग; या ठिकाणी मिळतोय १८०० रुपये दर, कांदा विक्रीसाठी लगबग
‘तेलंगणात १७०० रुपये, तर महाराष्ट्रात का नाही?’
‘बीएसआर’पक्षात प्रवेश केलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नुकताच त्यांच्या मतदारसंघातील कांदा तेलंगणातील हैदराबादला लोड करून पाठविला, त्याला १६०० ते १७०० रुपये क्विंटल भाव मिळाल्याच्या बातम्या आल्यानंतर, जर तेलंगणा १७०० रुपये भाव देऊ शकते, तर महाराष्ट्रात योग्य भाव का दिला जात नाही, असा सवाल उपस्थित करीत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.