शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत बुधवारी (१४ जून) ५.०५ टीएमसी (१७.३१ टक्के) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. खडकवासल्यामध्ये १.०३ टीएमसी, पानशेतमध्ये १.३५ टीएमसी, वरसगाव धरणामध्ये २.५३ टीएमसी आणि टेमघरमध्ये ०.१३ टीएमसी पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठाही घटून १.७६ टीएमसीवर गेला आहे.
जिल्ह्यातील धरणांतील साठा घटला
पुणे जिल्ह्यात ३१ धरणे असून, बहुतांश धरणांनी तळ गाठल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाऊस पडला नाही, तर ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. नीरा उजवा काल्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे. नीरा डाव्या कालव्यातून येत्या २१ जूनपर्यंत शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यानंतर शिल्लक पाणी पिण्यासाठी वापरले जाईल. जिल्ह्यातील सर्व धरणांमधील पाण्याचे १५ जुलैपर्यंत नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शिल्लक पाणीसाठ्याचे नियोजन केले जाईल, असेही जलसंपदा विभागाने सांगितले.
धरणांतील पाणीसाठा
धरण उपयुक्त साठा (टीएमसी) टक्के :
खडकवासला – १.०३ ५१.९९
पानशेत – १.३५ १२.७१
वरसगाव – २.५३ १९.७५
टेमघर – ०.१३ ३.५९
पवना – १.७६ २०.६४
भामाआसखेड – १.९८ २५.५७
मुळशी – १.०८ ५.३४