आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग व्यापत मान्सून पश्चिम बंगालच्या काही भागांत प्रवेश करू शकतो. मान्सूनची किनारपट्टीवर प्रगती दिसत असली, तरी राज्याच्या इतर भागांतील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी घाई करू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
‘सर्वदूर पावसासाठी वाट पाहावी लागणार’
‘आयएमडी’च्या क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेसचे (सीआरएस) प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, ‘परजॉय चक्रीवादळाचा प्रभाव १५ जूनपासून ओसरल्यानंतर राज्यात सर्वत्र मोसमी वारे खऱ्या अर्थाने सक्रिय होऊ शकतील. त्या नंतरही सर्वदूर पावसाच्या हजेरीसाठी काही दिवस वाट पाहावी लागू शकते. विस्तारित पावसाचा अंदाज वर्तवणाऱ्या आयएमडीच्या मॉडेलनुसार २० जूननंतर राज्याच्या बहुतांश भागांत पाऊस सक्रिय होऊ शकेल. आयएमडीने राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी.’
‘बिपरजॉय’ गुजरातला धडकणार?
बिपरजॉय चक्रीवादळाचे रविवारी सकाळी ‘अत्यंत तीव्र चक्रीवादळा’मध्ये रूपांतर झाले आहे. परिणामी, १५ जून रोजी ते गुजरातमधील कच्छ जिल्हा आणि पाकिस्तानमधील कराचीदरम्यान पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाने सौराष्ट्र आणि कच्छच्या किनाऱ्याला दक्षतेचा इशारा दिला आहे.
‘पूर्व-मध्य अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने गेल्या सहा तासांत प्रति किलोमीटर आठ तास वेगाने उत्तर पूर्व दिशेने मार्गक्रमण करताना अतिशय तीव्र रूप धारण केले आहे. हे चक्रीवादळ सकाळी साडेपाच वाजता मुंबईपासून पश्चिम दिशेला ५५० किलोमीटरवर, तर पोरबंदरपासून पश्चिम दिशेला ४५० किलोमीटर होते. हे चक्रीवादळ १४जूनच्या सकाळपर्यंत उत्तर दिशेकडे मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे.
१५ जून रोजी दुपारी हे चक्रीवादळ गंभीर रूप धारण करून सौराष्ट्र, कच्छ, गुजरातचे मांडवी आणि पाकिस्तानमधील कराचीच्या सागरी किनाऱ्यावरून जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी तब्बल १२५ ते १३५ किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील, अशी शक्यता आहे. आगामी दिवसांत हे चक्रीवादळ नेमक्या कोणत्या ठिकाणांवरून जाईल, याची माहिती समजेल, असे हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक डी. एस. पिल्लई यांनी सांगितले. चक्रीवादळाने सुरुवातीच्या दिवसांत वेगाने तीव्र रूप धारण केले. अरबी समुद्रावरील गरम वातावरणामुळे त्याने आणखी तीव्र स्वरूप धारण केले, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. हवामान विभागाने गुजरातमधील कच्छ, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि मोरबीसह काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
