• Sun. Mar 15th, 2026
    टोलनाक्यावर दिंडीतील वारकऱ्यांच्या गाड्या अडवल्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर; काय आहे प्रकरण?

    सातारा : आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंडीतील निघालेल्या वाहनांना आनेवाडी टोल नाक्यावरील रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे आदेश डावलून टोलमाफी नाकारल्याने टोलनाक्यावर काहीकाळ गोंधळाचे वातावरण झाले होते. यावेळी वारकऱ्यांनी भजन आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली.

    या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील आनेवाडी टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून टोल वसूल केला जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. आज सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान टोल वसुलीसाठी वाहने अडविल्याने वारकरी आक्रमक झाले. त्यांनी टोल नाक्यावर बसून भजन आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे टोलनाका वातावरण तणावग्रस्त झालं होते. पोलिसांच्या मध्यस्थीने वारकऱ्यांना टोलनाक्यावरील मार्ग मोकळा करून दिल्याने आंदोलन स्थगित करून वारकरी आळंदीकडे मार्गस्थ झाले.

    WTC Final चा तिसरा दिवस भारताचा, पाहा कोणत्या गोष्टींमुळे दिसली विजयाची आशा…
    संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आणि संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून अनेक वारकरी आपल्या वाहनांसह आळंदी व देहू येथे प्रस्थान करत आहेत. गेल्या चार दिवसांपासून आळंदीला पोहोचण्यासाठी हजारो वाहने पुणे – बंगळुरू आशियाई महामार्गावरून जात आहेत. मात्र, आनेवाडी टोल नाक्यावर रिलायन्स कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे वारकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न होत आहे.

    नुकताच आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोल फ्री करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, आज आनेवाडी टोल नाक्यावर रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी नाकारली. त्यामुळे वारकरी आक्रमक झाले. यावेळी वारकरी आणि रिलायन्सच्या अधिकाऱ्यांमध्ये काहीवेळ ताणाताणी झाल्याने टोलनाक्यावरील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

    भुईंज पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने आनेवाडी टोल नाक्यावर दाखल झाले. रिलायन्सचे अधिकारी आणि वारकरी यांच्यात मध्यस्थी करून वारकऱ्यांच्या वाहनांना मार्ग मोकळा करून दिल्याने वारकरी आळंदीकडे मार्गस्थ झाले. यावेळी आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाद मिटल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. आनेवाडी टोल नाक्यावरील प्रशासन आणि रिलायन्सचे अधिकारी कधी सुधारणार? असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.

    ओ दादा मला वाचवाना; अखेरच्या श्वासापर्यंत तो विनवणी करत राहिला; पण… घराचा आधार, माऊलीचा अक्षय गेला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed