महाराष्ट्रात अलर्ट जारी…
हवामान खात्याकडून आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातल्या मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी भागामध्ये या चक्रीवादळाचा परिणाम होणार असून गुजरातलाही या चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये यावेळी मोठ्या लाटा उसळतील तर मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या किनारपट्टीवरती वादळी वाऱ्यासह लाटा उसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Monsoon Prediction 2023 : यंदाचा मान्सून हसवणार की रडवणार, वाचा IMD चा हवामान अंदाज
बिपरजॉय चक्रीवादळ अपडेट…
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ८ ते १० जून या दरम्यान मच्छीमारांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. १२ जूनपर्यंत ही स्थिती कायम राहील. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तर मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये अशा सूचनाही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्या आहेत. दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने पुढे सरकत असल्याचा अंदाज आहे. सध्या हे चक्रीवादळ कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागातून पुढे सरकत असून याचा परिणाम राज्यातही पाहायला मिळेल. यामुळे किनारपट्टी भागाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल तर वादळी वाऱ्यासह शेतीलाही धोका होऊ शकतो.
हे चक्रीवादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रातून हळूहळू उत्तर आणि वायव्येकडे सरकत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. सध्या हे वादळ पोरबंदरच्या नैऋत्येला ९३० किमी अंतरावर आहे. हवामान खात्यानुसार, या वादळामुळे ताशी १३५ ते १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. ज्याचा परिणाम किनारी भागात होऊ शकतो.
१०, ११ आणि १२ जून रोजी जास्तीत जास्त प्रभाव…
अहमदाबादमधील हवामान विभागाच्या विज्ञान केंद्राच्या संचालक मनोरमा मोहंते यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या चक्रीवादळामुळे १०, ११ आणि १२ जून रोजी वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ नॉट्स वेगाने वाहू शकतो. वाऱ्याचा वेगही ६५ नॉट्सपर्यंत जाऊ शकतो. चक्रीवादळामुळे दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रसह किनारपट्टी भागात हलका पाऊस पडू शकतो. याबाबत सर्व बंदरांना कळविण्यात आले आहे.’