मोहन ज्ञानेश्वर मोरे (वय २२, रा. बंडगार्डन, पुणे, मूळ पिंपळगाव सय्यदमियाँ, जि. परभणी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. श्रीराम संजय मोरे (वय १९, रा. बंडगार्डन, पुणे, मूळ पिंपळगाव सय्यदमियाँ, जि. परभणी), रितेश सोमनाथ नलावडे (वय २१, रा. पुणे, मूळ टेंभुर्णी, जि. सोलापूर) जखमी झाले. तिघेही पुण्यातील एका महाविद्यालत शिकत होते.
जखमी श्रीराम संजय मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन जण दुचाकीवरून (एमएच २२ एएक्स ०८७३) मध्यरात्री दोनच्या सुमारास पुण्याहून कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आले होते. मंदिर बंद असल्याने ते तेथून टायगर पॉइंट येथे फिरायला आले. टायगर पॉइंट परिसरात फिरल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास ते पुन्हा एकवीरा देवीच्या दर्शनासाठी निघाले. त्या वेळी टायगर पॉइंट ते आयएनएस शिवाजीदरम्यान असलेल्या एअरफोर्स स्टेशन येथील एका वळणावर तीव्र उतारावर नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी लोखंडी दुभाजकावर जोरात आदळली.
जखमींनी प्रसंगावधान राखून रस्त्याने जाणाऱ्या एका कारला थांबवून मदत मागितली. कारचालकाने तिन्ही तरुणांना लोणावळ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून मोहन मोरे यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. लोणावळा शहर पोलिस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.