• Sat. Sep 21st, 2024

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्यात आजपासून ‘नाफेड’द्वारे कांदा खरेदी सुरु

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्यात आजपासून ‘नाफेड’द्वारे कांदा खरेदी सुरु

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कांद्याचे सातत्याने ढासळणारे भाव आणि त्यावरून शेतकऱ्यांची होणारी कोंडी लक्षात घेता आजपासून (दि. १) ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ यांच्याकडून उन्हाळी कांद्याच्या खरेदीस सुरुवात होणार आहे. या खरेदीचे औपचारिक उद्घाटन आज, गुरुवारी उमराणे येथील कांदा खरेदी केंद्रावर होईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.‘नाफेड’मार्फत कांदा खरेदी व्हावी यासाठी अनेक शेतकरी संघटना व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. कांद्याच्या पडलेल्या किमती विचारात घेत ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी दखल घेऊन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली होती. यानुसार आजपासून जिल्ह्यात १४ फेडरेशन व नोंदणीकृत फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांमार्फत त्याचप्रमाणे पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, अहमदनगर या जिल्ह्यांतही प्रत्यक्ष कांदा खरेदीला सुरुवात होणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

ग्राहकांना दिलासा देण्याचा उद्देश

‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ एकूण तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून, भाव वाढावा म्हणून ‘नाफेड’ खरेदी करीत नसून कांद्याचे किरकोळ बाजारात भाव वाढल्यास ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ग्राहक व्यवहार विभाग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांद्याची खरेदी केली जात आहे.

उमराणेत औपचारिक उद्घाटन

या समारंभास आमदार डॉ. राहुल आहेर, कांदा उत्पादक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित राहतील. ‘नाफेड’ व भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ३ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार आहे.
Appeal to Farmers: कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले मोठे आवाहन, पेरण्या कधी कराव्यात हे नेमके सांगितले
जिल्ह्यातून ८० टक्के कांद्याची उलाढाल

महाराष्ट्रात यावेळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात पीक आले आहे. नाशिक जिल्ह्यात राज्यातील ८० टक्के कांदा खरेदी-विक्री केला जातो. याचा परिणाम कांदा दरांवर होतो आहे. दर घसरल्याने शेतकऱ्यांना कांदा कमी दराने विक्री लागत होता. या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उपभोक्ता मामले खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडेदेखील पाठपुरावा केला असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed