• Sat. Sep 21st, 2024

पत्नीच्या निधनाचा धक्का; विरहाने अवघ्या अडीच तासांत १०५ वर्षीय सदाशिवरावांनीही प्राण सोडले

पत्नीच्या निधनाचा धक्का; विरहाने अवघ्या अडीच तासांत १०५ वर्षीय सदाशिवरावांनीही प्राण सोडले

लातूर: प्रेम खरं असेल तर ते वयाची मर्यादाही भेदून चिरंतन राहतं. वयाची शंभरी पार केल्यानंतरही आपल्या साथीदारावरील प्रेम अधोरेखित करणारी आणि मनाला चटका लावणारी कहाणी लातुरात समोर आली आहे. पत्नी सरस्वती (वय ९५) यांच्या निधनानंतर पती सदाशिव शामराव जाधव (वय १०५) यांनी अवघ्या अडीच तासात जगाचा निरोप घेतला. पत्नीचं निधन झाल्याचं कळताच सदाशिव जाधव यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या अन् या अश्रूधारा थांबल्या ते सदाशिवराव यांचे डोळे मिटल्यावरच. पती-पत्नीवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने पंचक्रोशीतील नागरिक हळहळले.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात होळी हे छोटेसे गाव आहे. या गावातील सदाशिव शामराव जाधव यांचा साधारण ७५ वर्षापूर्वी निलंगा तालुक्यातील शेडोळ येथील जयवंतराव धुमाळ यांनी कन्या सरस्वती यांच्याशी विवाह झाला. आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका दोघांनी घेतल्या. लग्नानंतर सरस्वती यांनी प्रेमळ स्वभावाने सासरच्या सगळ्यांची मने जिंकली. मोठ्या कुटुंबाचा गाडा दोघांनी समर्थपणे ओढला. आजही त्यांच्या एकत्रित कुटुंबात ३२ जण सुखाने राहत आहेत. त्यांना चार मुले आणि तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. सरस्वती जाधव या प्रत्येकाशी प्रेमाने वागत. पण वेळ प्रसंगी त्या कठोरपणे निर्णय घेत. सरस्वती यांच्या करारी स्वभावामुळे अनेकजण त्यांना घाबरून राहत.

Swarn Shatabdi Owner: रेल्वेची अशी चूक की भारताचा शेतकरी झाला थेट ट्रेनचा मालक, संपूर्ण किस्सा वाचून डोकं फिरेल

सदाशिव यांचं नातवांवर विशेष प्रेम. स्वत: निर्व्यसनी असल्याने सदाशिव नातवंडांनाही निर्व्यसनी राहण्याचा सतत उपदेश करत. आयुष्यभरात त्यांना कधीही रुग्णालयात जाण्याची वेळ आली नाही. मात्र सरस्वती यांना वर्षभरापूर्वी अर्धांगवायू झाला आणि त्या अंथरुणाला खिळल्या. तेव्हापासून सदाशिवराव थोडे खचले होते. अशा परिस्थितीही दोघांनी संसाराचा गाडा आपल्या हाती घेत हिंमतीने कुटुंबाला एकत्र ठेवले. आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ते कित्येक मैलाचा प्रवास पायीच करत. केवळ कुटुंबातील व्यक्तींवरच नव्हे तर प्राण्यांवरही ते जीवापाड प्रेम करत. २५ एकर शेतीसह त्यांच्याकडे जनावरेही होती. शेतातील माल लातूरच्या बाजारपेठेत नेण्यासाठी ते बैलगाडी घेऊन जात. विशेष म्हणजे त्यांच्या बैलगाडीच्या मागे आठ ते नऊ बैलगाड्या चालकाविना चालत. जनावरांना माया लावली की तेही माणसाला माया लावता,त ही त्यांची धारणा त्या बैलानी सार्थ केली असल्याची आठवण त्यांचे नातू ऋषिकेश जाधव यांनी सांगितली.

दरम्यान, सदाशिव अन् सरस्वती जाधव यांना आंबे खूप आवडत असत. त्यामुळे या दाम्पत्याच्या निधनानंतर जाधव कुटुंबियांनी त्यांच्या आठवणीत शेतात ११ आंब्याची रोपे लावली आहेत. या रोपांना त्यांनी सदाशिव अन् सरस्वती यांच्या अंत्यसंस्कारानंतर राख टाकली आहे. या आंब्यांच्या झाडाच्या रुपात त्यांची माया, प्रेम पुढच्या पिढीलाही मिळत राहील असा विश्वास त्यांचे सर्वात लहान पुत्र शहाजीराव जाधव यांना वाटतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed