मुळात पाटील हे नाव मराठा समाजाचे आहे, असे नाही. पाटील ही पदवी असून मराठा समाजाचा हक्क आहे, असे नाही. बऱ्याच ओबीसी घटकांना पाटीलकी देण्यात आली आहे. पूर्वीच्या काळात पाटलांना गावगुंड दाखवत मराठी चित्रपटांमध्ये बदनाम केले जायचे. त्यावेळेस मराठा समाजाने याबाबतीत आवाज उठवणे गरजेचे होते. मराठा समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे. मराठा समाजातील शेतकऱ्यांचे विषय, मराठा समाजातील तरुणांना रोजगाराची संधी असे अनेक गंभीर विषय आहेत. पण गौतमी पाटीलसारख्या नृत्यांगणांचा विषय उचलत प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रकार आहे. गौतमी पाटील यांचे आडनाव पाटील असल्याने मराठा समाजाची बदनामी होत आहे, असे मला पटत नाही. गौतमी पाटील यांना धमकी देणाऱ्यांनी मराठा समाजात अनेक प्रश्न आहेत याकडेही लक्ष घालावे, असेही सुरेंद्र पाटील यांनी म्हटले. छोट्या छोट्या कारणांमुळे मराठा समाज कधीच बदनाम होऊ शकत नाही. ज्यांनी धमकी दिली आहे हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सुरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.
‘नको त्या विषयात नको ते वाद घालून प्रसिद्धीचा मिळवण्याचा प्रयत्न’
गौतमी पाटीलने पाटील हे आडनाव काढावं, या विषयांवर जळगावातील रंगकर्मी तथा समाजशास्त्रीय अभ्यासक शंभू पाटील जे स्वत: मराठा पाटील आहे, त्यांनी मत व्यक्त केले आहे. गौतमी पाटीलने आडनाव लावू नये, असे तिला सांगणाऱ्या संघटनेची भूमिका म्हणजे समस्त मराठा समाजाची भूमिका आहे, असे नाही. नको त्या विषयात नको ते वाद घालून तुमची प्रसिद्धी वाढवून घ्यायची आहे का? असा सवाल शंभू पाटील यांनी उपस्थित केला आहे. कुठलाही मराठा समाज शिवबा संघटनेच्या मागणीला पाठिंबा देणार नाही. शिवबा संघटनेच्या अशा मागणीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, असे शंभू पाटील म्हणाले.
‘आडनाव काढण्याची मागणी करणाऱ्यांचा तीव्र निषेध’
पाटील या आडनावाविषयी शंभू पाटील बोलले. प्रत्येकाचे कूळ वेगळे आहे, मात्र मिळालेल्या पाटीलकीवरून पाटील आडनाव आले आहे, पाटील ही उपाधी आहे, ती जातीय नाही. कितीतरी जातीचे लोक पाटील आडनाव लावतात. त्यामुळे पाटील आडनाव लावायचं की नाही लावयचं? हे कुणीही ठरवू शकत नाही. दुसरीकडे संविधानानुसार आपण कुठलंही आडनाव ठेवू शकतो. त्यामुळे असैविधानिक कृत्य करून तेढ निर्माण करण्याचे काम करणे चुकीचे असल्याचे मत शंभू पाटील यांनी व्यक्त केले.
लावणीला आपण आपलं सांस्कृतिक धरोवर आहे असे म्हणतो. तुम्हाला बाई नाचताना बघायला आवडत असेल, तर मग तुमच्या घरातील बायका नाचल्या तर तुम्हाला वाईट वाटायचे काय कारण आहे, असा परखड सवालही शंभू पाटील यांनी उपस्थित केला आहे. दुसऱ्यांच्या बाय नाचताना कोण पाहते, कोण असे कार्यक्रम आयोजित करते, कोण अशा कार्यक्रमांना जाते या मुद्द्याला हात घातला पाहिजे आणि शेवटी मार्केट आहे, मागणी तसा पुरवठा होणारचं असेही शंभू पाटील यांनी सुनावले.