विरळी (ता. माण) येथील सागर महादेव गोरड (वय २३) हा तरुण १२ वीनंतर नोकरीच्या शोधात होता. नोकरी शोधत तो पोलीस भरतीचा अभ्यास करत होता. घरची परिस्थितीही बेताची होती. बँका आणि पतसंस्थेचं थकलेलं कर्ज कसं फेडायचं यासाठी तो गेले दोन वर्षांपासून नोकरी शोधत होता.
पोलीस भरतीचा अभ्यास सुरू असताना गावात एक वादावादी झाली होती. ती सोडवण्यासाठी तो गेला होता. हा वाद पोलीस ठाण्यात गेला होता. त्या वादामध्ये त्याचं नाव होतं. आपल्यावर गुन्हा दाखल असल्याने पोलीस भरतीची परिक्षा कशी द्यायची म्हणून त्याने परीक्षेला जाणं टाळलं होतं. त्यातच नुकताच पोलीस भरतीचा निकाल लागला आहे. गावातील त्याच्या मित्राचे गावात पोलीस भरतीचे बॅनर लागले होते. आपणही पोलीस भरती झालो असतो, या विचाराने तो खचला होता.
सर्वत्र आपल्याला अपयश येत आहे. मुंबईत भाऊ खासगी कंपनीत नोकरी करत आहे. मुंबईला नोकरीसाठी जायचं असं ठरवून त्याने थेट मुंबई गाठली. मुंबईत एका कंपनीत त्याला नोकरी लागली होती. १० दिवस कामावर गेल्यावर त्यानंतर काही दिवसांनी तो विरळी या आपल्या गावी कपडे, साहित्य नेण्यासाठी चार दिवसापूर्वी आला होता. मुंबईला जाण्यासाठी बुधवारी सायंकाळी ६ वाजताचं त्याने खासगी ट्रॅव्हलचं बुकिंग देखील केलं होतं. मुंबईला जाण्याची तयारी केली होती.
बुधवारी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी घरात गेला पण ६ वाजले तरी बाहेर येत नसल्याने त्याच्या घरातील मंडळीनी त्याला आवाज दिला. मात्र, त्याने कसलाच प्रतिसाद न दिल्याने घराचा दरवाजा तोडून आत पाहिलं तर घराच्या पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून सागर गोरड याने आपली जीवन यात्रा संपवली. सागरने गळफास लावून घेतल्याची बातमी पसरताच हळहळ सर्वत्र व्यक्त केली जात आहे.