ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील विशेष चौकशी पथकाने समीर वानखेडे यांची चौकशी केली होती. त्यानंतर ज्ञानेश्वर सिंह यांनी प्रतिज्ञापत्रात आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी आढळून आल्याचे निरीक्षण नोंदवले होते. या चौकशीसाठी आर्यन खान एनसीबी कार्यालयात असतानाचे सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले होते. मात्र, या सीसीटीव्ही फुटेजमध्ये फेरफार करण्यात आला. ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील टीमने मुंबई एनसीबी कार्यालयातील सीसीटीव्ही उपकरणे ताब्यात घेतली होती. मात्र, सीसीटीव्हीचा हा डेटा करप्ट झाला होता. याशिवाय, डीव्हीआर आणि मुंबई एनसीबीकडून देण्यात आलेली हार्ड डिस्क वेगवेगळी होती. मुंबई एनसीबी कार्यालयाची ही कृती पाहता त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी असाव्यात, त्यामुळे त्या चौकशी समितीला देण्यात आल्या नसाव्यात, असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्याबाबतच्या संशयात भर पडली आहे.
एनसीबीने धाड टाकली अन् अॅपल वॉच चोरीला
चौकशी समितीच्या अहवालात समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या एनसीबीच्या कारवायांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. एनसीबीचे अधिकारी छापे मारताना कोणत्याही कागदपत्रांच्या पूर्ततेशिवाय लोकांच्या मौल्यवान गोष्टी जप्त करतात. एनसीबीच्या एका अधिकाऱ्यावर छाप्याच्यावेळी अॅपल वॉच चोरल्यामुळे कारवाई करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर एनसीबीच्या छापेमारीवेळी संशयितांचे मोबाईल फोन जप्त करताना पंचनामा किंवा जप्तीचा मेमोही तयार केला जात नाही. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या अनेक वस्तूंची नोंद नसते, असे एनसीबीच्या चौकशी अहवालात म्हटले आहे.