कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडी देखील सक्रिय झाली आहे. महाविकास आघाडीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांचे प्रत्येकी दोन नेते असलेली एक समिती स्थापन करण्यात येत आहे.
महाविकास आघाडीची हीच समिती २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांचे तीन पक्षांसाठी जागावाटप ठरवणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नेते अशोक चव्हाण यांची नावे अंतिम झाली आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खासदार संजय राऊत यांच्या सोबत दूसरा नेता कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या निवड समितीवर संजय राऊत यांच्यासोबत दुसरा नेता म्हणून वर्णी लागावी यासाठी सुभाष देसाई,अनिल देसाई, अरविंद सावंत,विनायक राऊत,आदित्य ठाकरे या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळतेय. आज दुपारी यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार…? याकडेच आता सर्वांचे लक्ष लागलंय.
शिवसेना भवनात राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी चर्चा होणार आहे. या बैठकीपूर्वीच पुणे जिल्ह्याच्या ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाने आपल्या पदाचा राजीनामा देत ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थतीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेनेच्या गेल्या लोकसभा निवडणुकीत १८ जागा निवडून आल्या होत्या.