• Sun. Mar 8th, 2026

    तुम्ही पोलीस उतरवा, मी जनतेसकट रस्त्यावर उतरतो, बघूच प्रकल्प कसा होतो, ठाकरेंनी दंड थोपटले

    तुम्ही पोलीस उतरवा, मी जनतेसकट रस्त्यावर उतरतो, बघूच प्रकल्प कसा होतो, ठाकरेंनी दंड थोपटले

    महाड : मस्ती आलेल्या सरकारला वाटत असेल की राज्यभरातले पोलीस आणल्यावर इथे प्रकल्प होईल. मग मी पण सांगतो, राज्यभरातली जनता घेऊन रस्त्यावर उतरेन, असेल हिम्मत तर रोखून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं. मीच तो प्रकल्प तिथे व्हावा असं म्हणून माझं पत्र फडकवलं जातंय. होय मी दिलं होतं पत्र… पण लोकांवर लाठ्या चालवायला सांगितल्या नव्हत्या. सगळं पोलिस दल बारसूत उतरलंय, एवढे पोलीस चीनच्या सीमेवर ठेवले असते तर घुसघोरी झाली नसती, असा टोला त्यांनी लगावला.आज उद्धव ठाकरे यांनी बारसूला जाऊन तेथील आंदोलनकर्त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तुमचा जर विरोध असेल तर शिवसेना पक्षाचीही या प्रदूषणकरी प्रकल्पाला विरोध असेल, असं सांगून काळजीचं कारण नाही, तुमच्या मागे संपूर्ण शिवसेनेची ताकद उभी करतो, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यानंतर ठाकरे महाडला रवाना झाले. संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांची महाडमधील सभा सुरु झाली. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी शिंदे फडणवीसांसह मोदी सरकारलाही खडे बोल सुनावले.

    मी मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प व्हावा म्हणून पत्र दिलं होतं. पण लोकांची सहमती असेल, तरच प्रकल्प होईल असे सांगितले होते. अन्यथा गेट आऊट असंही त्यांना सांगितले होते. भूमिपुत्रांवर काठ्या चालवताय, प्रकल्प चांगला आहे तर लाठ्या चालविण्याची गरज काय आहे? असा सवाल विचारताना प्रकल्प चांगला आहे हे जनतेत जाऊन का सांगत नाही, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच तडीपारी, जिल्हाबंदी लावताना लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

    उद्धव ठाकरे काय म्हणाले?

    माझं पत्र दाखवलं जातंय. मला भीती नाही, कारण मी पाप केले नाही. गद्दारांनी मलिदा खाल्ला, उपऱ्यांना जमिनी विकल्या. मी मुख्यमंत्री म्हणून ठरवलं होत नाणार होऊ दिलं नाहीच. हे गद्दार माझ्याकडे यायचे बारसुसाठी… म्हणून माझ्याकडून पत्र दिलं गेलं. अंतिम मंजुरी मी स्वतः जाऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन ठरवणार होतो. सगळं पोलीस बल बारसूत नियुक्त केलंय. काय चालवलंय? इतका बंदोबस्त चीन सीमेवर लावले असते तर चीनने घुसखोरी केली नसती. पण बारसुत लाठ्या, अश्रुधूर का वापरता? तुम्ही प्रकल्पाची बाजू घेणारे जनतेत का जात नाही? आता लोकांना तडीपारी करताय. प्रकल्प जोवर कोकणी बांधव हो म्हणत नाही तोवर होऊ देणार नाही. पत्रकारांना अडवलंय. मातीची चाचणी करता मग मातीतल्या माणसांना पण विचारा. देश म्हणजे दगड धोंडे नाहीत. रिफायनरी जर आली तर कोकणी माणसाला काय भांडवलदारांच्या दारात उभे करणार आहात? याचे उत्तर कुणाकडे नाही. गद्दारांनी खोके घेतलेयेत, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed