मी मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प व्हावा म्हणून पत्र दिलं होतं. पण लोकांची सहमती असेल, तरच प्रकल्प होईल असे सांगितले होते. अन्यथा गेट आऊट असंही त्यांना सांगितले होते. भूमिपुत्रांवर काठ्या चालवताय, प्रकल्प चांगला आहे तर लाठ्या चालविण्याची गरज काय आहे? असा सवाल विचारताना प्रकल्प चांगला आहे हे जनतेत जाऊन का सांगत नाही, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच तडीपारी, जिल्हाबंदी लावताना लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
माझं पत्र दाखवलं जातंय. मला भीती नाही, कारण मी पाप केले नाही. गद्दारांनी मलिदा खाल्ला, उपऱ्यांना जमिनी विकल्या. मी मुख्यमंत्री म्हणून ठरवलं होत नाणार होऊ दिलं नाहीच. हे गद्दार माझ्याकडे यायचे बारसुसाठी… म्हणून माझ्याकडून पत्र दिलं गेलं. अंतिम मंजुरी मी स्वतः जाऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन ठरवणार होतो. सगळं पोलीस बल बारसूत नियुक्त केलंय. काय चालवलंय? इतका बंदोबस्त चीन सीमेवर लावले असते तर चीनने घुसखोरी केली नसती. पण बारसुत लाठ्या, अश्रुधूर का वापरता? तुम्ही प्रकल्पाची बाजू घेणारे जनतेत का जात नाही? आता लोकांना तडीपारी करताय. प्रकल्प जोवर कोकणी बांधव हो म्हणत नाही तोवर होऊ देणार नाही. पत्रकारांना अडवलंय. मातीची चाचणी करता मग मातीतल्या माणसांना पण विचारा. देश म्हणजे दगड धोंडे नाहीत. रिफायनरी जर आली तर कोकणी माणसाला काय भांडवलदारांच्या दारात उभे करणार आहात? याचे उत्तर कुणाकडे नाही. गद्दारांनी खोके घेतलेयेत, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
