• Sat. Sep 21st, 2024
राखीव पाण्यावर मुंबईची मदार?; सात धरणांमध्ये केवळ २६ टक्के पाणीसाठा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः ‘एल निनो’चा यंदा पावसावर परिणाम होण्याची भीती, तसेच मार्च आणि एप्रिलमध्येच तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास फिरत असल्याने वाढलेला उष्मा या पार्श्वभूमीवर धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्यांनी धास्ती वाढवली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याने आवश्यकता भासल्यास भातसा आणि अप्पर वैतरणा या दोन धरणांतील राज्य सरकारच्या राखीव साठ्यावर मदार असणार आहे. या पाणीसाठ्याच्या वापरासाठी आवश्यक प्रस्ताव मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला असून त्याच्या मंजुरीची मुंबई महापालिकेला प्रतीक्षा आहे. यासंदर्भातील पाणी नियोजनाचा कृती आराखडा मुंबई पालिकेने राज्य सरकारला सादर केला आहे. सध्या सात धरणांमध्ये २६ टक्के पाणी असून दर १५ दिवसांनी त्याचा आढावा घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

सध्याचे पाणी संकट पाहता राज्य सरकारने पुढील दोन महिन्यांच्या पाणी नियोजनासंदर्भात विशेष कृती आराखडा सादर करण्याचे आदेश राज्यातील सर्व महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभागानेही हा आराखडा सादर केला आहे. पाण्याची सद्यस्थिती काय आहे, गरज किती आहे, जलसंकट उभे राहिल्यास पाणीपुरवठ्याचे नियोजन काय असेल, असे अनेक प्रश्न सरकारकडून महापालिकांना विचारण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून यामध्ये गरज असल्यास राखीव कोट्यातील पाणीवापराचाही पर्याय असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांपैकी भातसा आणि अप्पर वैतरणा ही धरणे राज्य सरकारच्या अखत्यारित येतात. नियमितपणे पाणीपुरवठा करताना गरज भासल्यास या दोन धरणांमधून राखीव कोट्यातील पाणी मुंबईला मिळू शकते. त्यानुसार या दोन्ही धरणातील प्रत्येकी ७५ मिलियन क्युबिक मीटर पाणी मिळावे, असा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवल्याची माहिती देण्यात आली. पाऊस लांबला आणि पाणीटंचाई निर्माण झाल्यास या धरणातील पाण्याचा वापर मुंबईकरांसाठी करता येऊ शकेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच दर १५ दिवसांनी सात धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती सरकारला देण्यात आली आहे.

तूर्तास पाणीकपात नाही

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर आहे. या सातही धरणांमधून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये सध्याच्या घडीला ३ लाख ७१ हजार ९१६ दललक्ष लिटर म्हणजेच २६ टक्के पाणीसाठा आहे. २०२२ मध्ये ४ लाख १६ हजार ३९१ म्हणजेच २९ टक्के पाणीसाठा होता. आता २६ टक्केच पाणीसाठा असला तरीही तूर्तास पाणीकपात करण्याचा विचार नाही. मात्र पाऊस लांबल्यास आणि उकाड्यामुळे पाण्याचा वापर अधिक वाढला तर पाणीकपातीचा विचार होऊ शकतो.

अप्पर वैतरणा, भातसा मोठी धरणे

सात धरणांपैकी राज्य सरकारच्या अखत्यारित असलेली अप्पर वैतरणा आणि भातसा ही मोठी धरणे आहेत. अप्पर वैतरणात २ लाख २७ हजार ४७ दशलक्ष लिटर पाणीसाठवण क्षमता असून आता ६० हजार १८८ दशलक्ष लिटर पाणीसाठी आहे. तर भातसाची पाणी साठवण क्षमता ही ७ लाख १७ हजार ३७ असून सध्याच्या घडीला १ लाख ७४ हजार २६ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

मुंबईतील पाणीसाठा पाहता त्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. जलवाहिन्यांमधून होणारी गळती रोखणे, नियोजन करून पाणीकपात करणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक असेल. रहिवाशी इमारतींबरोबरच औद्योगिक वसाहतींनाही होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपातीचे नियोजन पालिकेने करायला हवे.

प्रदीप पुरंदरे, जल अभ्यासक

धरणातील सद्यस्थितीतील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

अप्पर वैतरणा : ६० हजार १८८

मोडकसागर : ४२ हजार ५७२

तानसा : ५४ हजार ४२६

मध्य वैतरणा : २६ हजार ४९८

भातसा : १ लाख ७४ हजार २६

विहार : १० हजार ८६६

तुलसी : ३ हजार ३४०

अपव्ययाने चिंता

गेल्या दोन महिन्यांमध्ये जलवाहिन्या फुटल्याने गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. त्यामुळेही धरणातील पाणीसाठ्यावर त्याचा काहीसा परिणाम झाला. गुंदवली-भांडुप संकुलादरम्यानच्या जलबोगद्याचे पाच महिन्यांपूर्वी नुकसान झाल्याने लाखो दशलक्ष लिटर पाणी वाया गेले होते.

४ मार्च : ठाणे येथे कोपरी पुलाजवळ जलवाहिनी फुटली

२७ मार्च : मुलुंड जकातनाका परिसरात जलवाहिनीचे नुकसान

८ एप्रिल : तानसा जलवाहिनीला पवई येथे गळती

२४ एप्रिल : पालीहिल येथे ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed