काहीही झालं तरी बारसूत माती परीक्षण होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिक शेतकऱ्यांनी आणि आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने पलिसांनी आज पुढचं पाऊल उचललं. तेथील आंदोलनकर्त्यांना हटविण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडून सौम्य लाठीलार्ज केला. यात काही शेतकरी जखमी झाले, काहींना भोवळ आली. याची दृश्ये संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेनंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.
दिल्लीतील मोगलांच्या आदेशाने कोकणात अमानुष खेळ
ज्या पद्धतीने कोकणात अमानुष खेळ सुरु आहे, तो दिल्लीच्या आदेशाने सुरु आहे. दिल्लीने सांगितलंय, काहीही झालं तरी रिफायनरी करायचीच, असा दिल्लीचा आदेश आहे. कारण परदेशी कंपन्या आहेत. दिल्लीवाल्यांचे करार झाले आहेत. मोठ्या प्रमाणात कमिशन हवंय. जमीन खरेदी खाजगी लोकांकडून झाली आहे. फायदा तोट्याचं गणित लावून बारसू झालीच पाहिजे, असा काहींचा आग्रह आहे.
शिवरायांच्या भूमीत शेतकऱ्यांच्या किंकाळ्या, मॉरिशसला जाऊन पुतळ्याचं अनावरण कसलं करता?
ही लोकशाही नाही. चर्चेतून मार्ग काढा, अशी भूमिका ज्येष्ठ नेते पवारांनी घेतली. मुख्यमंत्रीही चर्चेची भाषा बोलत आहेत. फक्त या विषयावर देवेंद्र फडणवीस बोलत नाहीयेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी मॉरिशिएसला गेले आहेत. महाराष्ट्रात मोगलाईचे आदेश देऊन ते परदेशात जाऊन बसलेत. छत्रपती शिवरायांच्या भूमीत तेथील लोकांना तुडवून मारलं जात असताना फडणवीसांना छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा अधिकार आहे काय?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. तसेच शिवराय फडणवीसांना शाप देतील, असा टोलाही राऊतांनी लगावला.
ज्या कोकणाने शिवसेना वाढवली, त्या कोकणी माणसावरचा अन्याय शिवसेना सहन करणार नाही
कोकणातला अमानुष प्रकार सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने सुरु आहे. पण शिवसेना सहन करणार नाही. तुमचं भांडण राजकीय आहे की वैयक्तिक आहे माहिती नाही, पण ज्या कोकण भूमीने शिवसेना वाढवली, टिकवली, त्या कोकणी माणसावरचा अन्याय आम्ही सहन करणार नाही, असंही राऊतांनी सांगितलं.
फडणवीसांच्या आदेशापुढे मुख्यमंत्र्यांचं ऐकतंय कोण?
मुख्यमंत्री म्हणतायत, जोरजबरदस्ती करणार नाही, इकडे पोलिस अश्रू धुराच्या नळकांड्या फोडतायेत, या मुख्यमंत्र्यांचं ऐकतंय कोण? मुख्यमंत्र्यांनी मनात आणलं असतं आणि त्यांची जर इच्छा असते, तर त्यांनी पोलिसांना आदेश दिले असते. पण मुख्यमंत्री असून सुद्धा मॉरिशला गेलेल्या गृहमंत्र्यांचे आदेश पोलीस ऐकतात. तुम्ही काहीही करुन इकडे सर्व्हेक्षण करा, असे आदेशच त्यांनी दिल्लीच्या मोगलांनी दिलेत.
महाराष्ट्राचं अर्ध पोलीस दल राजापूरमध्ये
बारसूतील प्रत्येक घडामोड दिल्लीतून पाहिली जातीये. दिल्लीतून सगळं मॉनिटरिंग होतंय. दिल्लीतून सगळी सूत्र हलतायेत. कोकणात यापूर्वी स्टेरोलाईड, नाणार, जैतापूर, अशी अनेक आंदोलने झालीत, पण आंदोलकांवर अशी जोरजबदस्ती झालेली आम्ही पाहिली नाही. इतक्या अमानुष पद्धतीने स्थानिकांवर हल्ले झाले नव्हते. महाराष्ट्राचं अर्ध पोलीस दल हे राजापूरमध्ये आणि बारसूत आणून ठेवलेत, असंही राऊत म्हणाले.
बारसूत बाहेरुन लोक आले म्हणता, ते कुठून पाकिस्तानातून की बांगलादेशातून?
बारसूत बाहेरुन लोक आल्याने परिस्थिती चिघळली, या उद्योगमंत्री उदय सावंतांच्या दाव्यावर राऊत म्हणाले, लोक बाहेरुन म्हणजे कुठून आले, पाकिस्तानातून की बांगलादेशातून? सुदानमधून आलेत की भूतानमधून आलेत? बारसू आणि स्थानिकांचे मुंबईत राहणारे जे नातेवाईक आहेत, जे स्थानिक मुंबईत रोजगारासाठी आहेत, ते आपल्या नातलगांना वाचविण्यासाठी बारसूत गेले आहेत, असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलं.
