निवडणुकीला सामोरे जाताना एक मराठा चेहरा असावा, असे भाजपला वाटत असल्याने आणि अन्य समीकरणेही जुळत असल्याने विखे पाटील यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा होती. दोन-तीन दिवसांपूर्वी विखे पाटील यांनी स्वत:च यावर स्पष्टीकरण दिले होते. असे काहीही नसल्याचे सांगताना फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे विखे पाटील म्हणाले होते.
विखे पाटील यांच्या या स्पष्टीकरणानंतर ही चर्चा काहीशी कमी झाली. मात्र, रविवारी रात्री अचानक फडणवीस यांनी लोणी येथे जाऊन विखे पाटील यांचा पाहुणचार घेतला. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे ते नगरच्या कुस्ती स्पर्धेहून थेट शिर्डी विमानतळावर जाणार होते. मात्र, त्यांनी मध्येच लोणी येथे थांबून विखे पाटील यांच्या कुटुंबीयांसोबत काही वेळ घालवून नंतर पुढील प्रवास केला. अर्थात ही कौंटुबीक भेट होती. सर्व सदस्यांना ते भेटले. सर्वांचा फोटोही काढला. मात्र फडणवीस आणि विखे यांच्यातील संबंध यामुळे अधोरेखित झाले. या घटनेचा संदर्भ देत जुन्या चर्चेला पुन्हा बळ मिळाले आहे. तसे झालेच तर अहमदनगर जिल्ह्याला प्रथमच मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचा आनंदही व्यक्त केला जाऊ लागला आहे.