अपघात इतका भयानक होता की या अपघातात मॅक्झिमा चालक विजय कौतीकराव जाधव (वय ३५ वर्ष) हे जागीच ठार झाले. तर गाडीमधील ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. अपघात झाल्याच्या मोठ्या आवाजाने रस्त्यावरून जाणाऱ्यांचे लक्ष गेले आणि एकच धावपळ सुरू झाली.
आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत गाडीमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले व जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर बस दुभाजकावर जाऊन आदळली होती. यावेळी संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या आहेत. तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथील जाधव कुटुंब आज १८ एप्रिल रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेसाठी निघाले होते. ७ ते ८ जणांचे एकत्रित कुटुंब मोठ्या उत्साहाने यात्रेसाठी जात असताना जालन्याजवळ अकोल्याकडे जाणाऱ्या बसचा आणि या खाजगी वाहनाचा समोरासमोर अपघात झाला.
या अपघातामध्ये विजय सावळाराम जाधव (३५) यांचा जागीच मृत्यू झाला तर वैभव जाधव हा १३ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे .७ ते ८ सदस्य असलेल्या जाधव कुटुंबातील उर्वरित सदस्य देखील यामध्ये जखमी झालेले आहेत.
अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मोठी मदत केल्याने मोठा अनर्थ टळला. खाजगी गाडी मध्ये २ महिला आणि २ लहान बालके यासह ८ जण प्रवास करत होते. यात्रेच्या ठिकाणी जाण्यासाठी घेऊन जात असलेल्या वस्तू घटनास्थळी विखुरल्या होत्या तर अचानक घडलेल्या या घटनेने साऱ्या कुटुंबाचा एकच आक्रोश चालू होता.
बोरघाटातील अपघातातून बचावलेल्या मुलाला पाहताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला
यात्रेसाठी जाणाऱ्या जाधव कुटुंबियांवर काळाचा घाला पडल्यामुळे पाहणाऱ्यांच्या देखील डोळ्यात अश्रू आले होते. हसत्या खेळत्या कुटुंबाने या प्रवासात एक सदस्य गमावल्यामुळे अतीव दुःख व्यक्त केले. परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.