सध्या अनेक प्रवासी लांबचा पल्ला असेल तर एसटी महामंडळ ऐवजी खासगी बसचा वापर करतात. मात्र, यामध्ये प्रवाशांचा जास्त ओघ असल्याने हे खाजगी बस मालक आपल्या गाड्यांकडे जास्त लक्ष देत नाहीत. फक्त पैसा कमावण्याच्या नादात गाडी नादुरुस्त असतानाही प्रवासी घेऊन जाण्याचे धाडस हे खाजगी बस चालक करत आहेत. आतापर्यंत अनेकदा या बस नादुरुस्त असल्याने अपघात झाल्याचे कित्येक वेळा समोर आले आहे. अशीच एक घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. नांदेड येथील एका खाजगी ट्रॅव्हल्सची बस पुण्याला जात होती. प्रवासी घेऊन जात असताना दिंद्रुड परिसरात बीड परळी रोडवर अचानक गाडीच्या स्टेअरिंग रॉड तुटल्याचं ड्रायव्हरच्या लक्षात आले.
यावेळेस ड्रायव्हरच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र यावेळेस ड्रायव्हर प्रसंगावधान दाखवून ब्रेकचा वापर करत गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात घालून त्याने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही गाडी इतरत्र कुठे पलटी झाली असती तर या गाडीतील ३० ही प्रवासी दगावण्याची शक्यता होती. चालकाने प्रसंगावधान दाखवून प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. मात्र यानिमित्ताने खासगी ट्रॅव्हल्स बसेसच्या तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. किती बसेस नादुरुस्त आहेत आणि प्रवाशांना घेऊन जाण्याच बसेसची क्षमता याची देखील पडताळणी होणे गरजेचे असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे.