• Sat. Sep 21st, 2024

Girish Bapat : काँग्रेसकडून गड हिसकावला, भाजपच्या वाघाने २५ वर्ष कसब्यावर राज कसं केलं?

Girish Bapat : काँग्रेसकडून गड हिसकावला, भाजपच्या वाघाने २५ वर्ष कसब्यावर राज कसं केलं?

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालंय. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून ते दुर्धर आजारीशी लढत होते. परंतु त्यांची झुंज अपयशी ठरली. गिरीश बापट यांच्याकडे सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून पाहिलं जायचं. त्यांच्या राजकारणाच्या शैलीवर अनेककदा चर्चा व्हायची. जात-धर्म-पंथ इतकंच काय तर पक्ष विरहित मतदार गिरीश बापट यांना कसे काय साथ देतात? गिरीश बापट यांच्याकडे नेमकी कोणती यंत्रणा आहे जी कसब्यात प्रत्येक वेळी यशस्वी होते, असा प्रश्न भल्याभल्या राजकीय पंडितांना पडायचा. परंतु १९९५ पासून २०१९ पर्यंत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना गिरीश बापट यांनी कार्यकर्ते आणि मतदारांचे एक जाळ उभारलं होतं.

जात-धर्माच्या पलीकडे जाऊन पक्ष विरहित मतदार हे गिरीश बापट यांच्या पाठीमागे २५ वर्ष उभे होते. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. बाजीराव रस्त्याच्या पूर्वेला आणि बाजीराव रस्त्याच्या पश्चिमेला मतदारांची विचारसरणी आणि सांस्कृतिक बदल प्रामुख्याने पाहायला मिळतो. पश्चिमेचा मतदार हा भाजपचा पारंपारिक मतदार मानला जातो तर पूर्वेचा मतदार हा काँग्रेसचा मतदार मानला जातो. मात्र गिरीश बापट यांचा संपर्क हा या मतदारसंघाच्या दोन्ही बाजूला तितकाच तगडा होता.

एकटे गिरीश बापट साधायचे ते भाजपच्या फौजेला जमलं नाही? ३ कारणांनी धंगेकरांना कसब्याची साथ!
भाजपचा पारंपारिक मतदार असलेला ब्राह्मण समाज हा नेहमीच गिरीश बापट यांच्या सोबत राहिला. पण गिरीश बापट हे कसब्यामध्ये फक्त ब्राह्मण समाजाच्या जीवावर कधीच आमदार झाले नाहीत. सर्व जाती धर्मातील कार्यकर्ते गिरीश बापट यांच्या पाठीशी १९९५ पासून उभे असल्याचे चित्र होतं. गिरीश बापट यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे हे फक्त पेठेतील भागातच नव्हे तर कसबा विधानसभा मतदारसंघातील पूर्व विभागात जिथे काँग्रेसचा पारंपारिक मतदार मानला जातो त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात आहे.

फक्त भाजपला मानणाऱ्या मतांवर आपण निवडून येणार नाही, याची पुरेपूर कल्पना गिरीश बापट यांना होती. त्याचमुळे सगळ्या जातीधर्माच्या लोकांबरोबर गिरीश बापट यांचे चांगले संबंध होते. कुणाच्या घरात शुभकार्य असो की दुख:द घटना असो गिरीश बापट आवर्जून त्यांच्या घरी जायचे. त्यांची विचारपूस करायचे. काही हवं नको विचारायचे. यामुळे लोकांमध्ये बापट यांच्याविषयी आदराची भावना होती. ज्यांना भाजपला मतदान करायचं नाही, असे लोकही बापट यांच्याकडून बघून कमळाला मतदान करायचे. त्यातून प्रत्येक वेळी बापट यांचा विजय सुकर होत गेला.

Girish Bapat Death: भाजप खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन
गिरीश बापट यांची कारकीर्द

गिरीश बापट हे तसे मध्यमवर्गीय घरातले. सुरुवातीच्या काळात Telco कंपनीत त्यांनी कामगार म्हणून काम केलं. रक्तात लढाऊ बाणा असल्याने पुढे कामगार चळवळीचं नेतृत्व केलं. इंदिरा गांधी यांच्या दमशाहीविरोधात देशभरात जे. पी. नारायण यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या जनआंदोलनात गिरीश बापट यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. यामध्ये त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. राजकीय जीवनात पाऊल ठेवण्यासाठी एवढा बेस त्यांना पुरेसा होता.

गिरीश बापट यांनी १९८३ साली पुणे महापालिकेची निवडणूक लढवली. पहिल्याच प्रयत्नात ते नगरसेवक झाले. अगदी भाजपची सत्ता नसताना स्थायी समितीचे अध्यक्षही झाले. पुढे १९९३ साली पोटनिवडणुकीत त्यांनी आपलं नशीब आजमविण्याचं ठरवलं. परंतु त्यात त्यांना अपयश आलं. काँग्रेसच्या वसंतराव थोरात यांनी गिरीश बापटांना पराभवाचा धक्का दिला.

गिरीश बापटांच्या निधनाने पुण्यातील पोकळी भरुन निघणार नाही, राष्ट्रवादीचा नेता ढसाढसा रडला
परंतु गिरीश बापट खचले नाहीत, त्यांनी निकराने लढा सुरुच ठेवला. १९९५ साली गिरीश बापटांनी पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवली. यावेळी त्यांना यश मिळालं. मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. सलग पाच वेळा त्यांनी कसब्याचं प्रतिनिधित्व केलं. पक्षाने २०१९ साली लोकसभेची उमेदवारी दिली. गिरीश बापटांनी हे आव्हानही पेललं. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विक्रमी मताधिक्याने लोकसभेची पायरी चढली.

परंतु खासदार झाल्यावर काळाची वक्रदृष्टी त्यांच्यावर पडली. पहिल्या काही महिन्यांतच त्यांना दुर्धर आजाराने गाठलं. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. पुण्यात सुसंस्कृत राजकारण करण्यात किंबहुना रुजविण्यात गिरीश बापट यांचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. आज एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण बघता, त्यातलं विखारीपण बघता, पुण्याला या राजकारणापासून गिरीश बापट यांनी कायम अलिप्त ठेवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed