मुंबई, दि. ११ : जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. पुढील दोन वर्षांत जिल्ह्यातील पाचशे शाळांचा दर्जेदार विकास करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. नवीन वर्षात नवी शाळा’ या संकल्पनेसह राज्याने आदर्श घ्यावा असे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत जालना जिल्हा परिषद शाळांच्या विकासकामांचा पुन्हा एकदा आढावा घेतला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे, मनपा आयुक्त अंजली शर्मा यांच्यासह विविध अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. यापूर्वीही १ सप्टेंबर रोजीच्या बैठकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा परिषद शाळांचा आढावा घेऊन सूचना केल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शाळांचा सर्वेकरून अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यावर चर्चा करून त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
शाळांचा निधी जागरूकतेने खर्च करा
पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, शाळा आणि अंगणवाड्यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी नियोजनबद्ध, काटेकोर आणि परिणामकारक पद्धतीने खर्च करावा. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याबरोबरच विकासकामांचा दर्जाही उत्तम राखावा.
जिल्ह्यातील शाळांचा विकास करताना आदर्श शाळेची संकल्पना डोळ्यासमोर ठेवावी. शाळांची आकर्षक रंगरंगोटी, उत्तम परिसर, आवश्यक पायाभूत सुविधा आणि दर्जेदार कामांवर भर द्यावा. जालना जिल्ह्यात विकसित होणाऱ्या या आदर्श शाळांचे अनुकरण राज्यातील तसेच इतर राज्यांतील शाळांनी करावे, अशा गुणवत्तेचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नवीन वर्षात नवी शाळा
‘नवीन वर्षात नवी शाळा’ ही संकल्पना घेऊन संबंधित यंत्रणांनी अभियान स्वरूपात काम करावे. शाळांच्या विकासकामांबाबत पुढील आढावा बैठक आपण स्वतः जालना येथे घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण योजनांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचाही आढावा घेतला. या योजनांसाठी उपलब्ध निधी निर्धारित वेळेत खर्च करावा. मंजूर कामांना कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही, याची दक्षता घेऊन ती गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
0000
नंदकुमार वाघमारे/विसंअ