• Thu. Sep 3rd, 2026

आमदार आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मराठवाड्यातून तब्बल 211 कंपन्या या एक तर बंद पडल्या किंवा बाहेर गेल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : “राजकारणापलीकडे जाऊन आता विकासाचा विचार करण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही जी कामे सुरू केली होती, त्याचे क्रेडिट हवे तर भाजपला घेऊ द्या; पण मराठवाड्याची अडकलेली विकासकामे पूर्ण करा”, असा रोखठोक सल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत त्यांनी मराठवाड्यातील उद्योग, बेरोजगारी, जीडीपी आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

मराठवाड्यातील औद्योगिक स्थितीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “गेल्या काही काळात मराठवाड्यातून तब्बल 211 कंपन्या एकतर बंद पडल्या आहेत किंवा राज्याबाहेर गेल्या आहेत.” मोठी निवडणूक नसतानाही सरकारचे लक्ष विकासाकडे नसून केवळ राजकारणाकडे आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवत ते म्हणाले की, “एकीकडे वार रूममध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आपापसात वाद सुरू आहेत, तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावर दरोडे पडत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील जनतेला सुरक्षेची हमी कोण देणार?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Maharashtra TimesTukaram Mundhe : मला माहिती मी देव नाही, कोर्टाच्या आदेशांनुसार सुधारणा करु, तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?

आदित्य ठाकरे मराठा आरक्षणावर काय म्हणाले?

मराठा आरक्षण आणि सामाजिक असंतोषाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “कोणाच्याही हक्काचे न काढता, ज्यांच्या अधिकाराचे आहे त्यांना आरक्षण दिलेच पाहिजे.” आज राज्यातील सगळे समाज रस्त्यावर उतरले आहेत, कारण सरकारकडून केवळ खोट्या आश्वासनांची खैरात केली जात आहे. सरकार म्हणून कोणीही पुढे येऊन ठोस भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे, असे ते म्हणाले.

Maharashtra TimesPune News : याला अजून मारायला हवं होतं, जो गणेशोत्सवावर बोलेल त्याला मारणारच; बापटांवर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा उन्मादपणा

जीडीपीच्या मुद्द्यावर टीका

देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोलताना त्यांनी जीडीपीच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जीडीपी 7.8 टक्के सांगतायत, पण तो प्रत्यक्ष दिसलाही पाहिजे. एकीकडे जीडीपी वाढीचा दावा केला जातो आणि दुसरीकडे पंतप्रधान सोने खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका असे सांगत आहेत, यात मोठी विसंगती आहे. महाराष्ट्राच्या उद्योगांच्या स्थितीवर सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अन्यथा ती केवळ कोऱ्या कागदावरच येईल,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

Maharashtra TimesPune News : वडिलांवर हात उचलणारा ते बापटांना मारहाण करणारा; पुण्यात थरार घडवणाऱ्या संतोष चव्हाणची धक्कादायक पार्श्वभूमी

आदित्य ठाकरे आणखी काय म्हणाले?

तरुणांच्या ताकदीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, जंतर-मंतरच्या आंदोलनानंतर देशातील Gen-Z तरुणाईमध्ये मोठी ताकद निर्माण झाली असून सर्व तरुण रस्त्यावर उतरत आहेत. “आमचे सरकार असताना आम्ही पूर्ण निधी दिला. मी रात्रीच्या वेळीही संभाजीनगरमध्ये फिरून महापालिकेच्या कामांचा आढावा घ्यायचो. मी आज निसर्ग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोललो तर मला ‘अर्बन नक्षल’ म्हटले गेले. पण मला क्रेडिटची गरज नाही, केवळ मराठवाड्याची कामे झाली पाहिजेत,” असे शेवटी आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. हवामान बदलामुळे मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर नदीजोड प्रकल्प आणि संशोधनाची गरज असताना मंत्री मात्र भलत्याच विषयांवर चर्चा करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.