पेपरफुटीच्या मुद्द्यावर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उबाठा आणि मनसेने रविवारी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी राजीनामा दिल्यानंतर, मोर्चाऐवजी शिवाजी पार्क परिसरात तिरंगा विजयी जल्लोष सभा झाली.
BJP Politics : शिक्षण खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे, मग फडणवीस तातडीनं दिल्लीत का? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं दिलं उत्तर
‘जात, धर्म, पक्ष विसरून आपण देशभक्त भारतीय म्हणून इथे जमला आहात. ही गर्दी विष्णूचा अवतार आहे. नरेंद्र मोदी यांनी आता तरी देशाकडे लक्ष द्यावे. तुमचे मंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत; त्यांना देशाचे काम करायला सांगा,’ असे उद्धव म्हणाले. ‘अर्थमंत्री घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत; पेपरफुटीचे फायदे सांगतात. संरक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणासाठी पुढे आले. खड्डा उर्फ रस्ता मंत्री इथेनॉलवर बोलतात. आत्महत्याग्रस्तांच्या वेदना आम्ही विसरणार नाही,’ असे ते म्हणाले.
प्रवास फार दूर नाही: आदित्य
‘देशातील तरुणांनी हुकूमशाहीला हादरा दिला आहे. ही नव्या भारतातील तरुणाईची ताकद आहे. ‘मंत्री प्रधान’ ते ‘पंतप्रधान’ हा प्रवास आता फार दूर नाही,’ असे आदित्य ठाकरे यांनी सभेनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. नितीन गडकरी यांच्या इथेनॉल धोरणाबाबत आणि निर्मला सीतारामन यांच्या निर्णयांबाबत जनतेत नाराजी असून आता ही पिढी प्रत्येक प्रश्नावर सरकारला जाब विचारणार आहे, असेही ते म्हणाले. ‘या तरुणाईने आम्हाला लढायला शिकवले आणि जल्लोष करायलाही शिकवले,’ असे सांगत अमित ठाकरे मंचावर गुडघे टेकून गर्दीसमोर नतमस्तक झाले. ‘आंदोलकांवरील गुन्हे दहा दिवसांत मागे घ्यावेत. अन्यथा महागात पडेल,’ असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
Eknath Shinde News | ठाकरे बंधू आणि राहुल गांधींवर एकनाथ शिंदे चांगलेच संतापले
राज ठाकरेंकडून आत्महत्याग्रस्तांचे स्मरण
नीट पेपरफुटीनंतर देशभरात २१ विद्याथ्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी त्यांची नावे वाचून दाखवली आणि एक मिनिट मौन पाळून आदरांजली वाहिली. ‘तुम्ही पेटवलेल्या आंदोलनाला यश आले, देशातील जेन-झी सरकारच्या झिंज्या कशा उपटते, हे या आंदोलनातून दिसले,’ असे राज ठाकरे म्हणाले. ‘मुंबई पोलिसांनी उत्तम सहकार्य केले. हाच महाराष्ट्र आणि दिल्लीच्या पोलिसांमधील फरक आहे,’ असे म्हणत राज यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले. त्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
ठिणगी पेटती ठेवणे आपले काम
‘या आंदोलनाने ठिणगी पडली असून देशात वणवा पेटला आहे. या आंदोलनामुळे मोदींनी पाहिले की, मते चोरता येतात, लोक चोरता येत नाहीत, मने चोरता येत नाहीत. ही ठिणगी पेटती ठेवणे आपले काम आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
