• Tue. Jul 21st, 2026

    Gulabrao Patil : खान्देशच्या ढाण्या वाघला चॅलेंज देण्यासाठी भाजपमध्ये तगडा नेता प्रवेश करणार असल्याची चर्चा, गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

    Gulabrao Patil : खान्देशच्या ढाण्या वाघला चॅलेंज देण्यासाठी भाजपमध्ये तगडा नेता प्रवेश करणार असल्याची चर्चा, गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

    जळगाव ग्रामीण मतदारसंघात खान्देशचा ढाण्या वाघ अशी ख्याती असलेले मंत्री गुलाबराव पाटील यांना आव्हान देण्यासाठी भाजप नवी खेळी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. महायुतीत एकत्र सत्ता उपभोगत असले तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपकडून मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. गुलाबराव पाटलांना जोरदार शह देण्यासाठी जळगाव ग्रामीणमधील एका बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश निश्‍चित मानला जात आहे. या राजकीय घडामोडींमुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे.

    नेमके काय घडतंय जळगाव ग्रामीणमध्ये?

    जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटील यांच्याविरोधात मजबूत पर्याय उभा करण्यासाठी भाजपच्या गोटातून गुप्त खलबते सुरू आहेत. स्थानिक पातळीवरील मातब्बर आणि जनाधार असलेल्या नेत्याला पक्षात प्रवेश देऊन पाटलांची कोंडी करण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचे समजते. महायुतीचा धर्म पाळण्याऐवजी भाजप स्वतःचा पाया मजबूत करण्यासाठी स्थानिक विरोधकांना ताकद देत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

    महायुतीत अंतर्गत बिघाडी वाढण्याची शक्यता

    गेल्या काही काळापासून जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात विविध मुद्यांवरून श्रेयवाद आणि मतभेद पाहायला मिळत आहेत. आता थेट जळगाव ग्रामीण मतदारसंघातच पाटलांना घेरण्याची रणनीती आखली गेल्याने महायुतीतील दरी आणखी रुंदावण्याची चिन्हे आहेत.

    गुलाबराव पाटील काय म्हणाले?

    या संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “भाजपमध्ये होणाऱ्या प्रवेशाबाबत आमचे काही म्हणणे नाही. परंतु, जे पक्षविरोधात किंवा शिवसेना-भाजप युतीविरोधात लढले आहेत, त्यांच्या प्रवेशाचा काही थेट संबंध येत नाही.जर त्यांना प्रवेश दिला जात असेल, तर आमच्याकडेही प्रवेश करणाऱ्यांची मोठी यादी तयार आहे आणि पुढे अनेकजण प्रवेश करतील”, असं सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केलं.

    “कोणाला शह देण्यासाठी प्रवेश घेतला जात नाही. लोकप्रतिनिधीची मतदारसंघावर पकड असली पाहिजे. आम्ही सातत्याने काम करणारे कार्यकर्ते आहोत. ज्यांचे कार्य संपलेले असते किंवा ज्यांना आपली प्रतिमा सुधारायची असते, काळे धंदे आणि भ्रष्टाचार झाकायचे असतात, तेच लोक दुसऱ्या पक्षात प्रवेश किंवा पक्षांतर करतात. प्रत्येकाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. भाजप त्यांचा प्रयत्न करत आहे, तर आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

    महायुतीत अंतर्गत बिघाडी वाढण्याची शक्यता

    गेल्या काही काळापासून जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात विविध मुद्यांवरून श्रेयवाद आणि मतभेद पाहायला मिळत आहेत. आता थेट जळगाव ग्रामीण मतदारसंघातच पाटलांना घेरण्याची रणनीती आखली गेल्याने महायुतीतील दरी आणखी रुंदावण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, हा संभावित पक्षप्रवेश वरिष्ठ पातळीवरून रोखला जातो की जळगावच्या राजकारणात आणखी मोठा भूकंप होतो? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.