जळगाव ग्रामीण मतदारसंघात खान्देशचा ढाण्या वाघ अशी ख्याती असलेले मंत्री गुलाबराव पाटील यांना आव्हान देण्यासाठी भाजप नवी खेळी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. महायुतीत एकत्र सत्ता उपभोगत असले तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपकडून मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. गुलाबराव पाटलांना जोरदार शह देण्यासाठी जळगाव ग्रामीणमधील एका बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. या राजकीय घडामोडींमुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे.
नेमके काय घडतंय जळगाव ग्रामीणमध्ये?
जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटील यांच्याविरोधात मजबूत पर्याय उभा करण्यासाठी भाजपच्या गोटातून गुप्त खलबते सुरू आहेत. स्थानिक पातळीवरील मातब्बर आणि जनाधार असलेल्या नेत्याला पक्षात प्रवेश देऊन पाटलांची कोंडी करण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचे समजते. महायुतीचा धर्म पाळण्याऐवजी भाजप स्वतःचा पाया मजबूत करण्यासाठी स्थानिक विरोधकांना ताकद देत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
महायुतीत अंतर्गत बिघाडी वाढण्याची शक्यता
गेल्या काही काळापासून जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात विविध मुद्यांवरून श्रेयवाद आणि मतभेद पाहायला मिळत आहेत. आता थेट जळगाव ग्रामीण मतदारसंघातच पाटलांना घेरण्याची रणनीती आखली गेल्याने महायुतीतील दरी आणखी रुंदावण्याची चिन्हे आहेत.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
या संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “भाजपमध्ये होणाऱ्या प्रवेशाबाबत आमचे काही म्हणणे नाही. परंतु, जे पक्षविरोधात किंवा शिवसेना-भाजप युतीविरोधात लढले आहेत, त्यांच्या प्रवेशाचा काही थेट संबंध येत नाही.जर त्यांना प्रवेश दिला जात असेल, तर आमच्याकडेही प्रवेश करणाऱ्यांची मोठी यादी तयार आहे आणि पुढे अनेकजण प्रवेश करतील”, असं सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केलं.
“कोणाला शह देण्यासाठी प्रवेश घेतला जात नाही. लोकप्रतिनिधीची मतदारसंघावर पकड असली पाहिजे. आम्ही सातत्याने काम करणारे कार्यकर्ते आहोत. ज्यांचे कार्य संपलेले असते किंवा ज्यांना आपली प्रतिमा सुधारायची असते, काळे धंदे आणि भ्रष्टाचार झाकायचे असतात, तेच लोक दुसऱ्या पक्षात प्रवेश किंवा पक्षांतर करतात. प्रत्येकाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. भाजप त्यांचा प्रयत्न करत आहे, तर आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
महायुतीत अंतर्गत बिघाडी वाढण्याची शक्यता
गेल्या काही काळापासून जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात विविध मुद्यांवरून श्रेयवाद आणि मतभेद पाहायला मिळत आहेत. आता थेट जळगाव ग्रामीण मतदारसंघातच पाटलांना घेरण्याची रणनीती आखली गेल्याने महायुतीतील दरी आणखी रुंदावण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, हा संभावित पक्षप्रवेश वरिष्ठ पातळीवरून रोखला जातो की जळगावच्या राजकारणात आणखी मोठा भूकंप होतो? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा