• Mon. Jul 13th, 2026

    Ratnagiri Goa Fort : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोवा किल्ल्याची तटबंदी पुन्हा कोसळली

    Ratnagiri Goa Fort : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोवा किल्ल्याची तटबंदी पुन्हा कोसळली

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोवा किल्ल्याची तटबंदी पुन्हा कोसळली आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ल्याची नव्याने उभारण्यात आलेली तटबंदी मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा ऐतिहासिक किल्ला कोट्यवधी रुपयांच्या निधीतून संवर्धित करण्यात येत असतानाच तटबंदी ढासळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

    महाराष्ट्र शासनाने मार्च २०२३ मध्ये गोवा किल्ल्याच्या संवर्धन आणि तटबंदी दुरुस्तीसाठी ६ कोटी ९२ लाख ७१ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली होती. पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली हे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच प्रवेशद्वारासमोरील नव्याने बांधलेला तटबंदीचा मोठा भाग मुसळधार पाऊस आणि मातीच्या धुपीमुळे कोसळला.

    कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

    या घटनेनंतर शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांच्या मते, शेकडो वर्षे जुनी मूळ तटबंदी आजही मजबूत उभी आहे, मात्र नव्याने बांधलेली तटबंदी पहिल्याच मोठ्या पावसात कोसळल्याने कामाच्या दर्जाची आणि तांत्रिक अंमलबजावणीची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

    स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

    हर्णे परिसरातील ऐतिहासिक फत्तेगड किल्ल्याची तटबंदीही अनेक ठिकाणी ढासळत असल्याने तेथील स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरातील सर्व ऐतिहासिक किल्ल्यांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

    ratnagiri news

    मराठा साम्राज्यात किल्ल्याला होतो विशेष महत्त्व

    दापोली तालुक्यातील हर्णे हे ठिकाण ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. समुद्रातील सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या किनाऱ्यावरील गोवा किल्ला, कनकदुर्ग आणि फत्तेगड या दुर्गत्रयीतील गोवा किल्ला विस्ताराने सर्वात मोठा आहे. मराठा आरमाराच्या इतिहासात या किल्ल्याला विशेष स्थान असून सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या सागरी सामर्थ्याचा तो साक्षीदार मानला जातो.

    शिवप्रेमींची दर्जेदार बांधकामाची मागणी

    दरवर्षी हजारो पर्यटक या ऐतिहासिक वास्तूला भेट देतात. मात्र तटबंदी कोसळल्यामुळे केवळ ऐतिहासिक वारशाचे नुकसान झाले नसून पर्यटकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाची तांत्रिक चौकशी करून जबाबदार अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच नुकसानग्रस्त तटबंदी दर्जेदार पद्धतीने तातडीने पुन्हा उभारावी, अशी मागणी स्थानिक नागरिक, शिवप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांकडून जोर धरू लागली आहे. या मागणीवर प्रशानाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा