रत्नागिरीच्या आरे समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या कोल्हापूरच्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. मित्राला स्थानिकांनी वेळीच वाचवले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी आहे 26 मे पासून समुद्र किनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट्स ही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र अशातच रत्नागिरी जवळ आरे समुद्रात कोल्हापूरचे दोन विद्यार्थी बुडाले आहेत, एकाला वाचवण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव अतुल रघुनाथ सुतार (वय १७, रा. कोल्हापूर) असे असून, मयूर विष्णू खाडे (वय १६, रा. कोल्हापूर) याला वेळीच बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
दोघेही विद्यार्थी बुडत असल्याचे लक्षात येताच इतर विद्यार्थ्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील तसेच झिप लाईनचे कर्मचारी सुरज चव्हाण, आदित्य पाटील, संस्कार साळवी, अजय मांजरेकर आणि महेश साळवी यांनी तातडीने समुद्रात धाव घेत बचावकार्य सुरू केले. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध आरे समुद्रकिनारी मंगळवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत कोल्हापूरहून एका खाजगी क्लासेसचा विद्यार्थ्यांचा समूह पर्यटनासाठी सहलीसाठी आला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील एका खासगी शिकवणी वर्गातील ४१ विद्यार्थ्यांचा गट शिक्षकांसह आरे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आला होता. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास विद्यार्थी समुद्रात आंघोळीसाठी उतरले असता अतुल सुतार हा समुद्रात अधिक खोलवर गेला. त्याला परत आणण्यासाठी त्याचा मित्र मयूर खाडे त्याच्या मागे गेला. मात्र समुद्रातील पाण्याच्या तीव्र प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात अडकून बुडू लागले.
विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर
जीवाची पर्वा न करता केलेल्या प्रयत्नांमुळे दोन्ही विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. मात्र अतुल सुतार याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तर बेशुद्धावस्थेतील मयूर खाडे याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उपचार सुरू असलेल्या विद्यार्थ्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील आदेश कदम यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला वेग दिला. दरम्यान, मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली असून ते रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तसेच परिसरात शोककळा पसरली असून समुद्रकिनारी सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा