म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: वांद्रे पूर्वेकडील गरीबनगर परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईनंतर प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र अतिक्रमण हटल्यावर मोकळ्या झालेल्या जागेला आता रिक्षाचालकांचा वेढा पडला आहे. गरीबनगर बसथांबा आणि परिसरात रिक्षाचालकांची मनमानी वाढल्याने वाहतूक कोंडी आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.
बस थांब्यांच्या जागेवरच रिक्षा
अतिक्रमण हटविल्यानंतर बसथांब्यालगतची जागा प्रवाशांच्या सोयीसाठी वापरली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र या जागेवर आता अनधिकृत रिक्षा थांबे निर्माण झाले आहेत. बसथांब्याच्या समोरच आणि रस्त्याच्या कडेला रिक्षा उभ्या राहत असल्याने बेस्ट बसगाड्यांना थांबण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. परिणामी, प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसगाडीत चढावे लागते, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे.
Bandra Demolition: गरीब नगरमधील कारवाईचा रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा; 50 नव्या एक्सप्रेस ट्रेन, वांद्रे टर्मिनसचा कसा होणार विस्तार?
विरार, दहिसर, बोरिवली आणि पश्चिम उपनगरांमधून वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) कामासाठी येणाऱ्या हजारो प्रवाशांचा गरीबनगर परिसरातून दररोज प्रवास असतो. रेल्वेने वांद्रे स्थानकात उतरल्यावर अनेक जण बस आणि शेअर रिक्षांचा वापर करतात. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, एका प्रवाशाकडून ५० रुपये भाडे आकारूनही चार प्रवासी भरल्याशिवाय रिक्षा सोडल्या जात नाहीत. याशिवाय, अनेक चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत रस्त्याच्या मध्यभागी किंवा वर्दळीच्या ठिकाणी रिक्षा उभ्या करतात.
रिक्षाचालकांच्या बेशिस्तिमुळे वादावादी
प्रवासी मिळवण्यासाठी चालकांमध्ये होणारी चढाओढ, सततचा गोंधळ आणि बेशिस्त पार्किंग यामुळे परिसरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. अनेकदा यावरून वादावादी आणि शाब्दिक चकमकींच्याही घटना घडतात. ‘अतिक्रमण हटविल्यानंतर परिसर मोकळा झाल्याने आनंद झाला होता. पण आता बसथांब्याभोवती पुन्हा रिक्षांचा कब्जा दिसत आहे. बस पकडताना विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे’, असे दहिसर येथील प्रवासी स्वाती पाटील यांनी सांगितले.
‘गरीबनगरमधील परिस्थिती पाहिल्यावर वाहतूक पोलिस आणि आरटीओ यंत्रणा खरोखरच कार्यरत आहेत का, असा प्रश्न पडतो. रिक्षाचालक कुठेही रिक्षा उभ्या करतात, अचानक यू-टर्न घेतात आणि चार प्रवासी भरल्याशिवाय रिक्षा सोडत नाहीत. या त्रासाला रोज हजारो प्रवाशांना सामोरे जावे लागते. नियम सर्वांसाठी समान असायला हवेत आणि सातत्यपूर्ण कारवाई व्हायला हवी’, अशी प्रतिक्रिया बोरिवलीतील प्रवासी राजेश शिंदे यांनी दिली.
Bandra East Demolition Drive : एक हजार कर्मचारी, १२ जेसीबी अन् गरीबनगरमधील ४०० झोपड्या जमीनदोस्त
अतिक्रमण हटविण्याची कारवाई ही स्वागतार्ह असली तरी त्यानंतर परिसरात कायमस्वरूपी शिस्त राखण्यासाठी वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी नियमित देखरेख करणे आवश्यक आहे. पश्चिम रेल्वे, मुंबई महापालिका, वाहतूक पोलिस, आरटीओ, रिक्षा चालक संघटना प्रतिनिधी यांनी एकत्र बैठक घेऊन बेशिस्तीवर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा, असा सूरही प्रवाशांमधून उमटत आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा