• Sun. Jun 14th, 2026
    गरोदर आईसह बाबा बुडाले, चिमुकली धरणाकडे बोट दाखवत निघाली; कुस्ती स्पर्धा सोडून पैलवान धावले, पण चौघांनी प्राण गमावलेच

    Nashik Kashyapi Dam Accident : दुर्घटनेची माहिती मिळताच धोंडेगाव येथील तरुणांनी तिथे सुरू असलेली कुस्तीची स्पर्धा अर्धवट सोडली आणि धरणाकडे धाव घेतली. जिवाची पर्वा न करता तरुणांनी पाण्यात उड्या घेतल्या पण चौघांचेही शवच हाती आले

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : हरसूल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कश्यपी धरणावर मंगळवारी (दि. २६) हृदयद्रावक दुर्घटनेत एका गरोदर मातेसह चौघांचा मृत्यू झाला. नियतीच्या या क्रूर खेळात अवघ्या दोन वर्षाची बालिका बचावली खरी. मात्र, तिच्या डोक्यावरचे मातृ-पितृछत्र कायमचे हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

    मुलांचा छोटासा हट्ट पुरवणं अंगलट

    उन्हाळ्याची सुट्टी… बच्चेकंपनीचा कल्लोळ… आणि धरणाच्या संथ पाण्याचा विलोभनीय देखावा… अशा आल्हाददायक वातावरणात घराशेजारच्या मुलांचा छोटासा हट्ट पुरविणे संगमनेरच्या ठोंबरे दाम्पत्यासाठी आणि मखमलाबादच्या पवार कुटुंबातील सख्ख्या भावांसाठी अखेरचा प्रवास ठरेल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. सिव्हिल इंजिनीअर असलेले सचिन कैलास ठोंबरे (वय ३२, मूळ रा.
    पिंपरणे, ठोंबरे वस्ती, संगमनेर) काही महिन्यांपासून कामानिमित्त मखमलाबाद येथील स्वामी विवेकानंदनगरात पत्नी रोहिणी आणि दोन वर्षांच्या मुलीसह वास्तव्यास होते.

    मंगळवारी सुट्टी असल्याने सचिन यांनी कश्यपी धरणावर फिरण्याचा बेत आखला. ते कारने निघत असतानाच शेजारी राहणारे आणि मूळचे दिंडोरीतील असलेले पवार कुटुंबातील केतन अनिल पवार (१६) आणि कौशल अनिल पवार (१४) या भावंडांनीही सोबत येण्याचा हट्ट धरला. दुपारी दोन वाजता आनंदाने निघालेले हे पाचही जण कश्यपी धरणावर पोहोचले, तेव्हा तिथल्या निसर्गरम्य वातावरणात ते हरखून गेले. मात्र, हा आनंद काही क्षणांचाच ठरला.
    Maharashtra TimesArun Kumar Tiwari : आमच्या बाबांना एव्हरेस्टच्या कुशीतच विसावू द्या, गिर्यारोहकाने शिखराजवळ प्राण सोडले, बॉडी परत न आणण्याचा कुटुंबाचा मोठा निर्णय

    …अन् आनंदाचा क्षण बनला काळ !

    धरणाच्या काठावर फिरत असताना सचिन आणि दहावीत शिकणाऱ्या केतनला पाण्यात उतरण्याचा मोह झाला. मात्र पाण्याचा आणि खाली असलेल्या धोकादायक गाळाचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. त्यांना बुडताना पाहून काठावर उभी असलेली सचिन यांची गरोदर पत्नी रोहिणी आणि दहावीत शिक्षणाऱ्या केतन यांनी कसलाही विचार न करता त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. परंतु, काळाने या सर्वांवर झडप घातली.

    आमदार निवासाचे दिवस, धर्मवीर ३ आणि तरडेंचं कौतुक; द महाराष्ट्र फाइल्स निमित्त मंगेश देसाईंशी गप्पा

    ‘त्या’ चिमुकलीचा टाहो आणि ‘देवदूत’ संगीता

    मम्मी… पप्पा…’ असे म्हणत धरणाच्या अथांग पाण्याकडे बोट दाखवून रडणारी ती दोन वर्षाची बालिका आणि काठावर अस्ताव्यस्त पडलेले चपलांचे जोड… हेच त्या भीषण दुर्घटनेची साक्ष देत होते. चारही जण पाण्यात बुडत असताना ती निष्पाप चिमुकलीही काठावरून पाण्याच्या दिशेने जात होती. त्याचवेळी संगीता घाडगे ही वाटसरू महिला तिथे देवदू‌तासारखी धावून आली. त्यांनी प्रसंगावधान राखून बाळाला कडेवर घेतले. बाळ सारखे पाण्यात बोट दाखवून रडत असल्याने संगीता यांना काहीतरी विपरित घडल्याचा संशय आला आणि त्यांनी तातडीने आरडाओरडा केला.
    Maharashtra TimesPune NEET Paper Leak : शहाचा नंबर ‘गॉड’ नावाने सेव्ह, मनीषा हवालदारच्या नवऱ्याच्या फोनमध्ये चॅटिंग, सदाशिव पेठेतील घरातील छाप्यात काय सापडलं?

    कुस्ती स्पर्धा सोडत तरुण धावले मदतीला

    दुर्घटनेची माहिती मिळताच धोंडेगाव येथील तरुणांनी तिथे सुरू असलेली कुस्तीची स्पर्धा अर्धवट सोडून धरणाकडे धाव घेतली. जिवाची पर्वा न करता तरुणांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि शोधमोहीम राबवून चौघांचेही शव बाहेर काढले. हरसूल पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, नाकातोंडात पाणी जाऊन श्वास गुदमरल्याने या सर्वांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा