कोल्हापूर ही प्रबोधनाची भूमी आहे. इथे पुरोगामी विचार केवळ चर्चांपुरते उरले नाहीत तर ते नागरिकांच्या आयुष्यात रुजले. कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराजांचा समृद्ध विचारांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे कोल्हापूरचं हे सामाजिक वेगळेपण नेहमीच ठळकपणे दिसून येतं. आतादेखील कोल्हापूरचा अभिमान वाटावा असा ऐतिहासिक निर्णय कोल्हापुरात घेण्यात आला आहे. आपत्ती काळात मदत करण्यासाठी जे पथक तैनात असतं त्या पथकात आता तृतीयपंथीयांना समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय केवळ घेण्यात आला नाही तर त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली आहे. दहा जणांच्या तृतीयपंथी टीमला आपत्ती काळात मदतकार्य कसे करावे, याचे प्रशिक्षण देखील सुरु झाले आहे. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांचं कौतुक होत आहे.