• Wed. Jul 22nd, 2026

    Vidharbh Rain News:विदर्भात पावसाची संततधार; पुलावर पाणी,वाहतूक ठप्प तर पुढील तीन दिवस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

    Vidharbh Rain News:विदर्भात पावसाची संततधार; पुलावर पाणी,वाहतूक ठप्प तर पुढील तीन दिवस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

    Vidharbh News:विदर्भात पावसाच्या दमदार हजेरी नंतर आता मात्र विदर्भात पावसाची संततधार बरसत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.परंतू रस्ते वाहून गेल्याने वाहनांची चांगलीच गैरसोय झाली

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    टीम मटा: दोन दिवसांपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. दोन आठवड्यानंतर संततधार बरसत असल्याने कापूस आणि सोयाबीन पिकांना दिलासा मिळाला आहे. तर धानाच्या रोवणीच्या कामांना गती आली आहे.शेतकऱ्यांसह नागरिक सुखावले आहेत.

    मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

    विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सध्या मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. मध्य उत्तर प्रदेश आणि ईशान्य मध्य प्रदेशावर निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. बुलढाणा जिल्ह्यात दिवसभर पाऊस सुरू असल्याने पिकांना जीवदान मिळाले.

    पिकांना दिलासा पण शेतकऱ्यांची मोठी लगबग

    भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळताच शेतीकामांना वेग आला असून, धानाच्या रोवणीच्या कामांना गती मिळाली आहे. सध्या रोवणीचा काळ सुरू झाला असून, शेतकरी पहाटेपासूनच शेतात दाखल होत आहेत. मात्र, या कामांसाठी लागणाऱ्या मजुरांची संख्या कमी पडत असल्याने शेतकऱ्यांची मोठी लगबग उडाली आहे.

    रस्ता वाहून गेला परिणामी शेकडो वाहने महामार्गावर अडकली

    चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस बरसला. जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी २६.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील रेपणपल्लीजवळ पुलाच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेला तात्पुरता वळण रस्ता मंगळवारी सकाळच्या संततधार पावसात वाहून गेल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली.परिणामी,शेकडो वाहने महामार्गावर अडकली असून हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या परिस्थितीचा एसटी सेवेलाही फटका बसला. अहेरी- सिरोंचा बस रेपणपल्लीजवळ अडकल्यानंतर गोलाकर्जी-राजाराम-छल्लेवाडा-कमलापूर मार्गे तब्बल २३ किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालावा लागला.

    Maharashtra TimesSunetra Pawar : तुमचं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात जिवंत राहील, अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवार भावूक, अश्रू थांबायचं नाव घेईनात

    पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे

    धापेवाडा बॅरेजला पाण्याची आवक वाढत असल्यामुळे पाण्याचा विसर्ग १०४४ क्युमेक्स वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगेच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. भंडारा येथील वैनगंगेची धोक्याची पातळी २४५.५० मीटर असून सध्याची पातळी २४३.६२ मीटरवर आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील काही ग्रामीण मार्ग प्रभावित झाले आहेत. खमारी गावाला जोडणारा पूल लहान असल्याने या पुलावर पाणी चढल्याने या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे.

    टीम मटा ऑनलाइन

    लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.… आणखी वाचा