• Sun. Jun 7th, 2026

    यंदा मान्सूनमध्ये नागरिकांवर जलसंकट! राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ३३.१६ टक्क्यांवर; ‘एल निनो’मुळे चिंता

    यंदा मान्सूनमध्ये नागरिकांवर जलसंकट! राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ३३.१६ टक्क्यांवर; ‘एल निनो’मुळे चिंता

    El Nino: एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून सरारसरीहून कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवला असताना राज्याती धरणांमधील पाणीसाठ्यामुळे पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेला असताना, पाणीटंचाईचे ढग गडद होऊ लागले आहेत. जलसंपदा विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील धरणांमध्ये केवळ ३३.१६ टक्के पाणीसाठा उरला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी असलेल्या २८.४६ टक्क्यांच्या तुलनेत हा साठा अधिक असला, तरी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले जाते.

    किती आहे पाणीसाठा?

    जलसंपदा विभागाने राज्यातील सर्व प्रमुख धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती जाहीर केली. त्यानुसार सोमवारपर्यंत एकूण तीन हजार २८ धरणांमध्ये ३३.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील मोठ्या १३८ प्रकल्पांमध्ये ३२.०६ टक्के पाणीसाठा असून, २६४ मध्यम प्रकल्पांमध्ये ३९.३८ टक्के साठा आहे. लघु प्रकल्पांमध्ये ३२.६२ टक्के उपयुक्त साठा आहे.Maharashtra TimesMumbai News: मान्सूनसाठी ‘एमएमआरडीए’ सज्ज! मेट्रो मार्ग आणि रस्त्यांवर विविध पायाभूत सुविधा; कसा होणार फायदा?

    राज्यातील तीन हजार २८ प्रकल्पांमध्ये एकूण १३ हजार ५४६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात अमरावती विभागाची स्थिती सर्वांत चांगली असून, तेथे ४३.७० टक्के पाणी उपलब्ध आहे. नागपूर विभागात ४०.७२ टक्के, कोकणात ३७.४४ टक्के आणि छत्रपती संभाजीनगर विभागात ३७.५७ टक्के साठा आहे. नाशिक विभागात ३४.५१ टक्के पाणी उपलब्ध आहे. पुणे विभागातील परिस्थिती सर्वाधिक चिंताजनक मानली जात आहे. पुणे विभागात केवळ २४.४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरीस पाणीपुरवठ्यावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात ११.१६ टक्के, घोड धरणात ३.२२ टक्के, माणिकडोहमध्ये ६.१९ टक्के, तर टेमघर आणि लोणावळा टाटा धरणात शून्य टक्के उपयुक्त साठा आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Weather: उकाड्याने मुंबईकर कासावीस, कमाल तापमानाचा पारा 40 अंशांहून अधिक; मान्सूनचे आगमन कधी होणार?

    नियोजनाचे आव्हान

    राज्यातील मोठ्या प्रकल्पांचा विचार करता, पाणीसाठ्याबाबत अमरावती विभाग आघाडीवर असून, तेथे ४४.५५ टक्के साठा उपलब्ध आहे. तर पुणे विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ २१.४७ टक्के साठा आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ४१.८८ टक्के, येलदरीत ५६.०४ टक्के, तर इसापूर धरणात ५२.१३ टक्के साठा उपलब्ध असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र बीड, धाराशिव आणि लातूरमधील अनेक लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा अत्यल्प असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व काळात पाणी वापराचे नियोजन करण्याचे आव्हान असणार आहे. त्यात जूनपासून ऑक्टोबरपर्यंत एल निनोचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा