• Thu. Jun 18th, 2026
    Census In Maharashtra: दीड लाख अंगणवाडी सेविकांचा जनगणनेच्या कामास नकार; अतिरिक्त कामाचे ओझे न लादण्याची सरकारला विनंती

    Census In Maharashtra: काही जिल्ह्यांमध्ये जनगणनेच्या कामासाठी अंगणवाडी सेविकांकडे यासंदर्भात सातत्याने विचारणा होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

    जनगणना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : शिक्षण, आरोग्य आणि पोषण या कामांचा भार असताना सरकार आता जनगणनेच्या अतिरिक्त कामाचे ओझे का लादत आहे, असा प्रश्न उपस्थित करीत राज्यातील दीड लाख अंगणवाडी सेविकांनी जनगणनेच्या कामास नकार दिला आहे. अंगणवाडीमध्ये येणारी मुले, त्यांचा आहार, शिक्षण, पोषण ही कामे प्राधान्यक्रमाने करावी लागत असून, या कामांच्या नोंदी ठेवण्याबरोबरच अंगणवाडीमध्ये उपस्थित राहावे लागत असल्याने अतिरिक्त कामे देऊ नयेत, अशी विनंती अंगणवाडी सेविकांनी केली आहे.

    मुंबई उपनगरांसह राज्याच्या अनेक भागांत कुपोषणाची समस्या कायम आहे. त्यामुळे बालकांना पोषण आहार देणे, मुले आणि बालकांना आरोग्यसेवा देऊन मृत्यूचे प्रमाण कमी करणे, कुपोषण निर्मूलनाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासारखी विविध स्तरांवरील कामे अंगणवाडी सेविकांना करावी लागतात. शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पोषक आहार, तसेच पूर्व शालेय शिक्षण यासारख्या सेवा देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणे, मुले आणि माता, किशोरवयीन मुली यांच्यासाठी विविध योजना राबवणे, विविध प्रकारची सर्वेक्षणे करून सरकारला माहिती, आकडेवारी पुरवणे ही महत्त्वाची कामेही त्यांच्याकडे असतात. मागील काही महिन्यांत या कामामध्ये वाढ झाली आहे. अतिरिक्त कामाचा ताण न देता अंगणवाडी सेविकांकडे सध्या असलेल्या कामाचा ताण हलका करावा, त्यांना वेळेवर मानधन मिळावे, अंगणवाड्यांचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची अधिक गरज असल्याची भूमिका मुंबईसह राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी मांडली आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Heatwave: सूर्य कोपला! उष्णतेच्या लाटांचा राज्याला तडाखा, तब्बल 183 तालुक्यांत पारा 45 अंशांपार
    ‘अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नियुक्ती लहान मुलांच्या विकासकामासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना जनगणनेसारखी अतिरिक्त कामे देणे योग्य नाही. सरकारच्या आदेशानुसार त्यांच्याकडून अशी कामे करून घेता येत नाहीत. जनगणनेसाठी प्रगणक म्हणून काढलेला आदेश तत्काळ रद्द करायला हवा’, असे संघटनेच्या कॉ. शुभा शमीम यांनी सांगितले.

    Maharashtra TimesSadabhau Khot : ‘शेट्टी, जाणकरांना ज्या पद्धतीने उचललं त्याची गरज नव्हती’, सदाभाऊ खोत यांची भूमिका
    एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या अंगणवाडी परिक्षेत्रातील शून्य ते सहा वयोगटातील बालके, गर्भवती महिला, स्तनदा माता यांच्या आहार आणि आरोग्य तसेच बालकांच्या पूर्व शालेय शिक्षणाची जबाबदारी पार पाडतात. मात्र, या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेशी संबंध नसलेल्या अन्य कोणत्याही सेवांचे कामकाज, निवडणुकीचे, सर्वेक्षणाचे, योजनाबाह्य काम देण्यात येऊ नये. योजनाबाह्य कामामुळे त्यांच्यावर असणारा अतिरिक्त कामकाजाचा ताण वाढत आहे, असे एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगार यांनी स्पष्ट केले.

    जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
    ‘अंगणवाडी सेविकांकडे दैनंदिन कामाचा ताण वाढता आहे. आहार, पोषणाशी संबंधित सेवा या योग्य प्रकारे द्यायला हव्यात. त्यात दिरंगाई झाली तर माता आणि बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. अतिरिक्त कामामुळे नियोजित कामांना न्याय देता येत नाही. त्यामुळे कोणत्याही कारणांमुळे योजनाबाह्य काम देऊ नये,’ अशी विनंती करणारे पत्रही एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा