• Sun. Jun 7th, 2026

    मनमाड-दौंड रेल्वे मार्गाच्या कामाला गती! भूसंपादनासाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण; पुणे ते नाशिक प्रवास सुखकर होणार

    मनमाड-दौंड रेल्वे मार्गाच्या कामाला गती! भूसंपादनासाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण; पुणे ते नाशिक प्रवास सुखकर होणार

    Manmad-Daund Railway Line: दौंड-मनमाड रेल्वे मार्गामुळे पुणे ते नाशिकदरम्यान प्रवास सोपा होणार आहे. या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली असून सध्या जमिनीची मोजणी करण्यात आली आहे.

    म.टा. वृत्तसेवा, मनमाड: दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी सोमवारी (दि. ११) मनमाड येथील अश्विनीनगर परिसरात रेल्वे प्रशासन व भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने भूसंपदानाकरिता मोजणी करण्यात आली. सुरुवातीला या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात येण्याबाबत चर्चा होती; मात्र प्रत्यक्षात रेल्वे रुळापासून अवघी १० ते १२ मीटर जागा प्रकल्पासाठी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने अनेक रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

    मनमाड येथे रेल्वेकडून विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत असून, दौंडहून येणाऱ्या रेल्वेसाठी नव्या प्रकल्पांतर्गत जमीन संपादन करण्याबाबत प्रशासनाने जाहीर निवेदने प्रसिद्ध करीत, तसेच जवळपास १०० रहिवाशांना मोजणीबाबत सूचना दिल्या होत्या. यात अश्विनीनगर, गुजराती मळा, कलावती आई मंदिर परिसर या भागाचा समावेश होता. सोमवारी मोजणीसाठी रेल्वेचे वरिष्ठ इंजिनिअर सुधांशू, भूमी अभिलेखचे बर्डे, मनमाड पालिकेचे अनिल गवळी आदी उपस्थित होते. यावेळी रेल्वे लाइनपासून पुढील १० ते १२ मीटर जागा अधिग्रहित करण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले. त्या पद्धतीने मोजणी व मार्किंग करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नाना शिंदे, बबन सांगळे, भाऊसाहेब सांगळे, सौरभ कुलकर्णी, नगरसेवक अमोल नरवडे यांच्यासह रहिवाशांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

    Maharashtra TimesMumbai News: वाहनांनंतर सागरी किनारा मार्गावर हेलिकॉप्टरचे उड्डाण; वरळी जेट्टीवर उभारणार ‘हेलिपॅड’, कसा होणार फायदा?

    ड्रेनेज व्यवस्था, संरक्षक भिंत हवी

    जमीन संपादीत केल्यानंतर प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्यावर प्रशासनाने ड्रेनेजकडे लक्ष द्यावे, संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नाना शिंदे व रहिवाशांनी केली. ड्रेनेजबाबत रेल्वे अधिकारी सुधांशू यांनी स्थानिक नगरपरिषदेकडे निर्देश करण्यास सांगितले.

    रहिवाशांना नाहक मनस्ताप?

    रहिवासी घरे भूसंपादनात जाणार असे चित्र नोटिसीद्वारे समोर आले होते. त्यामुळे शेकडो कुटुंबांत घबराट पसरली होती. प्रत्यक्षात मात्र थोडीच जागा भूसंपदीत केली जाणार असल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला असला, तरी नावे जाहीर करून मोजणीपूर्वी काही दिवस नाहक मनस्ताप का देण्यात आला, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला.

    Maharashtra TimesHigh Risk Buildings: 827 अतिधोकादायक, तर 18 हजार इमारती धोकादायक! रहिवाशांवर जीव मुठीत धरून जगण्याची वेळ; महामुंबईत यादी जाहीर

    दरम्यान, दौंड-मनमाड दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत दौंड ते काष्टी रेल्वे मार्गाची चाचणी काही महिन्यांपूर्वी झाली. या 13 किलोमीटर अंतराची चाचणी झाली असून लवकरच नगर ते दौंडपर्यंत दुहेरीकरण पूर्ण होईल. गेल्या तीन वर्षांपासून नगर ते दौंड रेल्वेच्या दुहेरीकरणाचं काम सुरू आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा