महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेवरुन आता दोन मतप्रवाह बघायला मिळत आहेत. तर विकास लवांडे यांचं पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आंदोलन सुरु आहे. या प्रकरणाची A टू Z माहिती आपण जाणून घेऊयात.
या घटनेनंतर विकास लवांडे पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी त्यांची आहे. आपल्याला पिस्तूल दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, असा देखील आरोप विकास लवांडे यांनी केला आहे. दुसरीकडे कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी विकास लवांडे यांच्या जीवे मारण्याच्या धमकीच्या आरोपांचं खंडन केलं आहे. आपल्याकडे पिस्तूल नसल्याचं संग्राम भंडारे यांनी स्पष्ट केलं आहे. तर विकास लवांडे यांनी संग्राम भंडारे हे खोटे बोलत असून कोणता आरोपी आपल्याकडे पिस्तूल आहे, असं सांगतो? असा सवाल करत आरोप केले आहेत. विकास लवांडे घटनेनंतर नेमकं काय म्हणाले? ते जाणून घेऊयात.
विकास लवांडे नेमकं काय म्हणाले?
“माझं आज लोणी काळभोर जवळ हवेली तालुक्यात आळंदी म्हातोबाची या गावात प्रवचन होतं. तुकाराम जवळकर यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने माझी आज प्रवचन सेवा होती. मी सकाळी आज आठ वाजता तिथे गेलो होतो. प्रवचन संपल्यानंतर तिथे आमचे नातेवाईक आहेत. तिथे चहापानी केल्यानंतर पावणे दहाच्या सुमारास गावातून निघालो. गावातून एक किमी बाहेर आल्यानंतर स्मशानभूमीच्या जवळ दोन-तीन गाड्या आल्या. आमच्या गाडीला आडवी लावली आणि आमच्या गाडीला थांबवलं.”
“एक-दोन जण पुढे आले, बोलायचं आहे म्हणून खाली उतरा म्हणाले. खाली उतरल्यानंतर अचानक दहा-पंधरा जण आले, मला ढकललं आणि स्मशानभूमीच्या आत नेलं. मला रिव्हॉल्वर दाखवत हे बघितलं का काय आहे ते, तुझा आम्ही खात्मा करु. तू आमच्या गुरुमाऊलीवर का बोलला? तुझा आम्ही खात्मा करु, असं म्हणत संग्राम भंडारे यांनी माझ्या अंगावर शाई फेकली.”
“अक्षय कांचन आणि संग्राम भंडारे या दोन व्यक्तींना मी ओळखलं आहे. बाकी कुणी माझ्या ओळखीचं नव्हतं. मात्र ते सर्व गुंड मला धमकी देत होते की, तुझा आम्ही खात्मा करु. माझ्यावर शाईच्या चार बाटल्या ओतल्या. त्यामध्ये केमिकल होतं. मी चेहरा धुतला आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आलो आहे. या सगळ्यांपासून माझ्या जीविताला शंभर टक्के धोका आहे. कारण गेले काही दिवस सोशल मीडियातून मला अनेक धमक्या आणि फोन आले आहेत.”
“या धर्मांद विचारांच्या लोकांनी, ज्यांनी संतांना त्रास दिला होता, हा संग्राम भंडारे नथुराम गोडसे, बिष्णोई गँगचे समर्थन करतो, संगमनेरला राडा घातला, तोच संग्राम भंडारे आज दहा-बारा गुंडांना सोबत घेऊन माझ्यावर अचानक असा हल्ला करतोय. रिव्हॉल्वर दाखवून मला तुझा खात्मा करायचा आहे, अशी धमकी दिली आहे. मी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आलो आहे. पोलीस फिर्याद घेत आहेत. त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस ठाणे सोडणार नाही. इथेच मी सत्याग्रह सुरु करणार आहे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही.”
विकास लवांडे यांचं पोलीस ठाण्यात सत्याग्रह आंदोलन
विकास लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात केली आहे. दुसरीकडे शाईफेक प्रकरणी कीर्तनकार संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त एका वृत्त वाहिनीने दिलं आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
हा वाद नेमका कशामुळे?
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामींची घुसखोरी वाढत असल्याचं वक्तव्य केलं होतं. “वारकरी संप्रदायात 60 लोकांची मांडणी ही धर्मांद शक्तींना बळ देणारी आहे. आम्ही आता अशा धर्मांध लोकांची यादी तयार करायला सुरुवात केली आहे”, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी 20 नावे जाहीर करत संबंधित नावे वारकरी संप्रदायातील कथित घुसखोर असल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपांमुळे नवा वाद निर्माण झाला. यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. अखेर या वादाचा आज मोठा फुगा फुटला. कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह काही जणांनी विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केली.
मंत्री नितेश राणे यांच्याकडून शाईफेकच्या घटनेचं समर्थन
दरम्यान, विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकच्या घटनेचे मंत्री नितेश राणे यांनी समर्थन केलं आहे. नितेश राणे यांनी ‘एक्स पोस्ट’मध्ये संग्राम भंडारे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत आपलं समर्थन जाहीर केलं आहे. “बापू अभिमान आहे, जय श्रीराम”, अशी पोस्ट नितेश राणे यांनी केली आहे.
रोहित पवार यांचा पोलीस ठाण्यात जाण्याचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
“महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या कट्टरतावाद्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून पुराव्यांसह आवाज उठवत आहेत. त्याचाच राग मनात धरून आज विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी शाई ओतून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! या हल्ल्यामुळं विकास लवांडे यांनी केलेले आरोप हे सिद्धच झाले आहेत आणि असे हल्ले हे काही नवीन नाहीत. यापूर्वीही ज्ञानोबा-तुकोबांनाही मनुवादी वृत्तीने असंच छळलं होतं, त्यामुळं या गुंडांच्या हल्ल्याला आम्ही भीक घालणार नाहीत.”
“या हल्ल्यातील सर्व गुंडांच्या सरकारने तत्काळ मुसक्या आवळाव्यात आणि हा हल्ला करताना लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळं त्यांना तातडीने पोलीस संरक्षणही पुरवावं, अन्यथा सत्तेच्या आशीर्वादानेच केलेला हा हल्ला आहे, असे आम्ही समजू. यापुढं लवांडे यांना काही झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, याची सरकारने नोंद घ्यावी.”
“विकास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज दुपारपर्यंत FIR दाखल झाला नाही तर संध्याकाळी मी स्वतः पोलीस स्टेशनला जाणार… थोर संतांनी दाखवलेला बंधुभावाचा आणि शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार हाच खरा महाराष्ट्र धर्म असून कोणत्याही कट्टरवाद्यांना, गुंडापुंडांना आणि शिव्या देणाऱ्या मनुवाद्यांना हा विचार आम्ही पुसू देणार नाही…! भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी… – जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज”.
सुषमा अंधारे यांच्याकडून विकास लवांडे यांचं अभिनंदन, काय म्हणाल्या? वाचा सविस्तर
“विकास लवांडे जी आपलं मनःपूर्वक अभिनंदन..! कामक्रोधमधमोहमत्सर या पासून संत संप्रदाय प्रचंड लांब असतो. संत तुकोबाराय संत ज्ञानेश्वर यांचा सांप्रत समाजाने अतोनात छळ केला मात्र उपरोक्त संतांनी कधीही कुणाचे अहित चिंतले नाही. माणूस विकार मुक्त झाला पाहिजे यासाठी ते कायम सम्यक विचार मांडत राहिले.”
“आज आपल्या सोबत जे काही आळंदीत घडले हा एका अर्थाने आपला विजय आहे. कारण वारकरी संप्रदायाच्या नावाखाली झालेली घुसखोरी आणि ज्यांना वारकरी संप्रदायाचा नेमका विचारच कळला नाही अशा नकली लोकांचे बुरखे फाडण्यात आपण यशस्वी झालात. वारकरी संप्रदायामध्ये हिंसक विचारांच्या लोकांची घुसखोरी झाली आहे हे पवार साहेबांचे म्हणणे या मंडळींनी पुन्हा एकदा खरे करून दाखवले.”
“आता आपण अजून एक काम करूया. अशा लोकांवर पोलीस कारवाई व्हावी किंवा कायदेशीर त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी कुठलीही अपेक्षा मागणी आपण कुणीही करू नये. कारण जिथे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा एफ आय आर लिहून घेतला जाऊ शकत नाही आणि यावर त्यांच्याच पत्नी असणाऱ्या उपमुख्यमंत्री, किंवा खासदार मुलगा , चकार शब्दाने बोलू शकत नाही अशा राज्यात आपण आपली एफ आय आर व्हावी यासाठी प्रयत्न करणे शुद्ध वेडेपणा आहे.”
“उलट जे जे लोक अशा पद्धतीच्या कृती करतात त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या समारंभांमध्ये पहिल्या रांगेच्या खुर्च्यांमध्ये बसवावे. त्यांचे पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन सत्कार समारंभ घडवून आणावेत. शक्य झालं तर सत्तेतल्या काही लाभाच्या जागा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देता येतात का? हे सुद्धा बघावे.”
“प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकणारे असतील किंवा हनुमंत पवारला मारहाण करणारे असतील किंवा तुम्हाला दहापेक्षा दाखवणारे लोक असतील अशा सगळ्या लोकांना अधिकाधिक राजाश्रय कसा मिळेल आणि त्यांचा सत्कार सन्मान कसा होईल यासाठी उलट आपण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे सगळे मिळून मागणी करूया.”
