• Sun. Jun 7th, 2026

    Maharashtra Weather: मुंबई पुन्हा भट्टीसारखी तापणार! काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; हवामान विभागाकडून उष्ण वातावरणाचा इशारा

    Maharashtra Weather: मुंबई पुन्हा भट्टीसारखी तापणार! काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; हवामान विभागाकडून उष्ण वातावरणाचा इशारा

    Weather Alert: येत्या काही दिवसांत महामुंबई परिसरातील तापमान पुन्हा वाढणार असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. 6 ते 8 दरम्यान तापमान वाढीची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: महामुंबई परिसरातील पारा पुन्हा चढू लागण्याचा अंदाज आहे. बुधवार ६ मेपासून मुंबई, ठाण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्येही उष्ण आणि दमट वातावरणासाठी ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. कमाल तापमानाचा पारा मुंबईमध्ये ६ ते ८ मे दरम्यान ३६ अंश किंवा त्यापुढे जाण्याचा अंदाज आहे. मात्र आता वातावरणात आर्द्रता वाढली आहे. या आर्द्रतेमुळे तापमानाची जाणीव ३६ अंशांपलीकडे वाटण्याची शक्यता आहे.

    तापमान वाढीमागचं कारण काय?

    सध्या वाऱ्यांची दिशा पश्चिमेकडून असून त्यानंतर खालच्या थरात उत्तर तसेच ईशान्य पट्ट्यातून वारे वाहतील. हे वारे उष्ण आहेत. तसेच महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थितीही निर्माण होईल. यामुळे उष्ण वारे खालच्या थरात कोंडले जाऊन तापमान चढे जाणवू शकेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. ही स्थिती दोन ते तीन दिवस महामुंबई परिसरात जाणवू शकते, असा सध्याचा अंदाज आहे.Maharashtra TimesMumbai Police Duty Hours : आठ तास ड्युटीचे ‘बारा’ वाजले! आता ’12 तास काम, 24 तास आराम’ संकल्पना आणा, पोलिसांची वाढती मागणी

    मुंबईतील हवामान

    मुंबईमध्ये सोमवारी सांताक्रूझ येथे ३४.२ तर कुलाबा येथे ३४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथे सरासरीपेक्षा १.२ अंशांनी कमाल तापमान अधिक होते. तर आर्द्रता वाढल्याने किमान तापमानही आता चढे नोंदवले जात आहे. कुलाबा येथे २७.५ तर सांताक्रूझ येथे २८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथे किमान तापमान सरासरीपेक्षा १.१ अंशांनी तर सांताक्रूझ येथे २.४ अंशांनी अधिक होते. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाड्याची जाणीव सकाळी आणि दुपारीही तीव्र होत आहे.

    Maharashtra TimesMumbai Underground Tunnel: गिरगाव चौपाटीपर्यंत बोगद्याचा विस्तार होणार! ‘ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह’ भुयारी मार्गाचा नवा प्लॅन मंजूर; 5 मिनिटांत प्रवास

    विदर्भ, मराठवाड्यातील हवामान

    अलिबागमध्ये सोमवारी कमाल तापमानाचा पारा सरासरीहून तब्बल ४.७ अंशांनी अधिक नोंदला गेला. अलिबाग येथे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर डहाणू येथे ३६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भामध्ये, तसेच मराठवाड्यामध्येही पारा चढा आहे. पण शुक्रवारनंतर हे तापमान अधिक वाढू शकले. उत्तर आणि ईशान्य पट्ट्यातून आलेल्या वाऱ्यांचा परिणाम नंतर विदर्भावरही होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत कोकण विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर त्यानंतर विदर्भ पट्ट्यामध्ये उष्णतेची लाट येऊ शकते.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा