• Sun. Jun 7th, 2026

    Nagpur News : धामणगावातील संसार पुन्हा उभे राहणार! बाधितांच्या पुनर्वसनासाठी सरकार सरसावलं, महिनाभराचे अन्नधान्य, अन् प्रत्येकी अडीच लाखांची मदत जाहीर

    Nagpur News : धामणगावातील संसार पुन्हा उभे राहणार! बाधितांच्या पुनर्वसनासाठी सरकार सरसावलं, महिनाभराचे अन्नधान्य, अन् प्रत्येकी अडीच लाखांची मदत जाहीर

    Dhamangaon Fire Relief Fund : नागपूरच्या धामणगावमध्ये भीषण आगीत ५० घरे खाक झाली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाधितांसाठी अडीच लाखांची मदत, मोफत रेती आणि पुनर्वसन योजना जाहीर केली आहे.

    धामणगाव अग्निकांड, अडीच लाखांची मदत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे शनिवारी भीषण आग लागून सुमारे ५० घरे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. आग इतकी भीषण होती की काही वेळातच तिने संपूर्ण वस्तीला विळखा घातला. प्राथमिक माहितीनुसार, या परिसरात एका शेतकऱ्याने शेतात वणवा पेटवल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वाऱ्याच्या वेगामुळे ही आग झपाट्याने गावाकडे पसरली आणि अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

    चंद्रशेखर बावनकुळे घटनास्थळी

    या घटनेनंतर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जैस्वाल आणि उमरेडचे आमदार संजय मेश्राम यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बाधित कुटुंबांना धीर देत शासनाकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले.

    अडीच लाख रुपयांचा निधी मंजूर

    पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, जळालेल्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थेच्या माध्यमातून २० लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून त्यातील काही रक्कम तातडीने नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे.

    Maharashtra TimesSolapur Crime : वराह पालनाचा वाद विकोपाला, 6 जणांनी दिवसाढवळ्या भर चौकात तरुणाला निर्घृणपणे संपवलं, सोलापूरात दहशत

    महिनाभराचे अन्नधान्य अन्…

    राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनीही तातडीने २३ हजार रुपयांची शासकीय मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच घर बांधकामासाठी मोफत रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जळालेल्या कागदपत्रांमुळे अडचणीत आलेल्या नागरिकांसाठी विशेष शिबिरे घेऊन आवश्यक कागदपत्रे पुन्हा तयार करून दिली जाणार आहेत. बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यात महिनाभराचे अन्नधान्य, किचन साहित्य, सिलेंडर, वीज मीटर यांची उपलब्धता करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सायकली व शालेय साहित्यही देण्यात येणार आहे. तसेच घरांचे पुनर्बांधकाम पूर्ण होईपर्यंत प्रभावित कुटुंबांच्या निवासाची तात्पुरती व्यवस्था करण्यात येत आहे. आगीत काही गोठे जळून गेल्याने जनावरांचेही नुकसान झाले आहे. यासाठी गोठ्यांच्या पुनर्बांधणीसाठी अनुदान देण्यात येणार असून मृत जनावरांच्या बदल्यात नवीन जनावरे देण्याची योजना राबवण्यात येत आहे. जनावरांसाठी चाऱ्याचीही व्यवस्था करण्यात येत आहे.

    एकीकडे मदत दुसरीकडे कारवाईच्या सूचना

    दरम्यान, उमरेड एमआयडीसीमधील ४० ते ५० कंपन्यांनी एकत्र येऊन सीएसआर फंडाच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेत बाधित नागरिकांना सर्वतोपरी मदत मिळावी, यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर शेतात वणवा पेटवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

    पुण्यातील प्रकरणावर बावनकुळे म्हणाले…

    दरम्यान, पुण्यातील अत्याचार प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होईल. एखाद्याने खून किंवा बलात्कार केला म्हणून त्याला रस्त्यावर फाशी देण्याचा कायदा आपल्या देशात नाही. आपल्याला एवढे पाहावे लागते की कोर्टासमोर आरोपी सुटू नये, यासाठी पक्के पुरावे असणे आवश्यक आहे. याकरिता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जे चार्जशीट दाखल केले, त्यात कोणतीही त्रुटी राहू नये याची काळजी घेतलेली आहे, असे बावनकुळे म्हणाले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा