• Mon. Jun 15th, 2026

    Nashik-Kalyan Train: ‘नाशिक-कल्याण लोकल’ला रेड सिग्नल, घाटाची रुंदी कमी; तांत्रिक अडचणींमुळे लोकल सेवा अशक्य

    Nashik-Kalyan Train: ‘नाशिक-कल्याण लोकल’ला रेड सिग्नल, घाटाची रुंदी कमी; तांत्रिक अडचणींमुळे लोकल सेवा अशक्य

    Nashik-Kalyan Local Train: नाशिकरोड ते कल्याण दरम्यान दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावर नियमित लोकल सेवा सुरू करण्याची मागणी अनेक वर्ष केली जात आहे. पण तांत्रिक कारणे देऊन नाशिककरांना एप्रिल फूल केल्याचा आरोप खासदार वाजेंनी केला आहे.

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: नाशिक-कल्याणदरम्यान लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दीर्घकालीन मागणीवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा टोलवाटोलवीची भूमिका घेतली आहे. कसारा-कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर आधीच ३६ उपनगरी गाड्या सुरू नवीन लोकलसेवा सुरू करणे हे मार्गाची क्षमता, उपलब्ध पाथ, रोलिंग स्टॉक, पायाभूत सुविधा आणि देखभाल व्यवस्थेवर अवलंबून असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. कसारा-इगतपुरी घाटाची रुंदी कमी असून, लोकल गाड्यांची रुंदी जास्त असल्याचे उत्तर दिल्याने केंद्र सरकारने नाशिककरांना एप्रिल फूल केल्याचा आरोप खासदार राजाभाऊ वाजेंनी केला आहे.

    नाशिककरांच्या पदरी निराशा

    या लोकल रेल्वे सेवेसंदर्भात खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित करीत रेल्वे मंत्रालयाला जाब विचारला. मात्र, मंत्रालयाने दिलेले उत्तर हे तांत्रिक कारणांवर आधारित आणि ठोस कालमर्यादेविना असल्याने पुन्हा एकदा नाशिककरांच्या घोर निराशा पदरी पडली आहे. नाशिकरोड ते कल्याण या मार्गावर लोकल सेवा सुरू करण्याची मागणी ही केवळ सुविधा नसून अत्यावश्यक गरज असून विद्यार्थी, शेतकरी, लघु व्यापारी आणि रोजंदारी करणारे हजारो प्रवासी दररोज या मार्गावरून प्रवास करतात.Maharashtra TimesMumbai Local Video: अरे, ट्रेन आली! मुलीवरून दोन शाळकरी पोरांमध्ये वाद, थेट रुळांवर हाणामारी; मुलुंड रेल्वे स्थानकावर गोंधळ

    सध्या मार्गावर लोकल चालवणे शक्य नाही

    अनेक स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो, असे खासदार म्हणाले. यावर रेल्वे मंत्रालयाने आपल्या उत्तरात या मार्गावर आधीच ३६ उपनगरी गाड्या सुरू असल्याचे नमूद केले. मात्र, सर्वात महत्त्वाची अडचण म्हणून मंत्रालयाने कसारा-इगतपुरी घाट विभागातील बोगद्यांची मर्यादित रुंदी अधोरेखित केली. लोकल गाड्यांची रुंदी अधिक असल्याने सध्या या मार्गावर लोकल सेवा चालवणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने सदर लोकलसेवा सुरू होणे आता स्वप्नच ठरले आहे.

    Maharashtra TimesPune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची चाचणी पूर्ण, जून महिन्यात धावणार मार्गिका; पहिल्या टप्प्यात 12 स्थानकं

    अडचणी दूर करण्यासाठी कोणती ठोस उपाययोजना केली जाणार, नवीन तंत्रज्ञानाचा वापर होणार का, तसेच ही सेवा नेमकी कधी सुरू होणार याबाबत मंत्रालयाने कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न अद्याप अनुत्तरितच राहिला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा