• Sun. Jun 7th, 2026
    Satara ZP मधील गोंधळ विधान परिषदेपर्यंत, उपसभापतींचे अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश, पण नंतर निर्णय राखून ठेवला

    सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीतील गोंधळानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशींसह तीन अधिकाऱ्यांचे निलंबनाचे आदेश उपसभापती नीलम गोरे यांनी दिले होते, पण नंतर तो निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून जिल्हाधिकारी आणि प्रशासनावरही चौफेर टीका होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत प्रशासनाकडूनच नियम आणि कायदा पायदळी तुडवला गेला. लोकशाहीचा भरदिवसा मुडदा कसा पाडला गेला ते हजारो लोकांनी पाहिले. त्यामुळे साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. त्याचे पडसाद आज विधान परिषदेत उमटल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशींसह तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले, पण प्रवीण दरेकरांनी याबद्दल आक्षेप घेत उपसभापतींना अशा स्वरुपाचे निर्देश देण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी निलंबनाचा गोऱ्हे यांचा निर्देश राखून ठेवल्याची घोषणा केली.

    जोरदार ड्रामा

    जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्रभर जोरदार ड्रामा सुरू होता. जिल्ह्यातले चारही मंत्री, पोलीस अधिकारी आणि साध्या वेशातील पोलीस रात्रभर झोपले नव्हते. पोलिसांकडून पहाटेपासून हॉटेलची तपासणी, सदस्यांची झाडाझडती सुरू होती. सत्ताधारी सदस्य असलेल्या हॉटेलच्या रूमच्या बाहेर साध्या विषयातील पोलिसांचा पहारा होता. ते पोलीस नजीकच्या जिल्ह्यातील होते, अशी देखील चर्चा ऐकायला मिळत आहे. ते पोलीस आहेत की कार्यकर्ते, हे भाजप सदस्यांना देखील माहीत नव्हते.

    पोलिसांनी बळाचा वापर केला

    निवडणुकीच्या दिवशी भाजपच्या सदस्यांना घेऊन ट्रॅव्हल्स आल्यानंतर पोलीस शांत होते. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्य ट्रॅव्हल्समधून आल्यानंतर जिल्हा परिषद गेटवरील पोलिसांनी बळाचा वापर केला. कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये पोलिसांनी थेट मंत्र्यांशी झटापट, रेटारेटी केली. अध्यक्ष निवडणुकीच्या मतदानावेळी थेट सभागृहात राजकीय दंडेलशाही झाली. सर्व घटनांमुळे साताऱ्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकावर चौफेर टीका होत आहे.

    Maharashtra TimesPrithviraj Chavan : ‘साताऱ्यातील सत्तेच्या खेळाचा राज्य सरकारवर परिणाम होणार’, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

    जिल्हाधिकारी संतोष पाटील

    साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची आधीच वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळख आहे. अकोल्यात जिल्हा पुरवठा अधिकारी असताना रेशनचा गहू असलेले तब्बल ४८ ट्रक धान्य अधिकाऱ्यांनी संगनमताने गायब केल्याची घटना सन १९९९ मध्ये घडली होती. त्याचा निकाल २४ वर्षांनी म्हणजे संतोष पाटील हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना लागला होता. त्यामध्ये त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. निकालानंतर ते रजेवर गेले होते. तत्पूर्वी २०२३ मध्ये ते तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सहसचिव होते.

    पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची कारकीर्द

    पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची कारकीर्द तर अत्यंत वादग्रस्त राहिली आहे. एजाज खान अटक तसेच पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात आरोपींच्या वकिलांना गोपनीय माहिती पुरवल्याचे त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. आंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर त्यांच्यासह तीन अधिकाऱ्यांचे निलंबन झाले होते. त्यानंतर त्यांची पुणे आणि नंतर साताऱ्यात बदली झाली. फलटणच्या शासकीय रूग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात एका पोलीस उपनिरीक्षकाला अटक झाली. त्यामुळे तुषार दोशी जिथे जातात तिथे वादग्रस्त ठरतात. हेच या घटनांवरून दिसून येतं.

    Maharashtra TimesAshok Kharat : ‘मी अवतारी पुरुष, तू मागील जन्माची अप्सरा, माझ्याशी लग्न कर’, अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड

    जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीचे पडसाद विधान परिषदेत उमटल्यानंतर पोलीस अधीक्षकांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर आणि भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या निलंबनाचे आदेश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले, पण त्यांचा हा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा