साताऱ्याचे सत्तानाट्य संपण्याचं नाव घेताना दिसत नाही. बापू शिंदे यांचे अपहरण झाल्याची तक्रार करण्यात आली होती. पण ते स्वत: आज पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि आपले अपहरण झाले नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची 20 मार्चला झालेली निवडणूक वादळी ठरली. पोलिसांनी केलेल्या धरपकड, अटकसत्र आणि धक्काबुक्कीमुळे साताऱ्याच्या प्रशासनाची लक्तरे राज्याच्या वेशीवर टांगली गेली. त्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवड प्रक्रियेत सातारा पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या दोन सदस्यांना अटक केली. ज्यांच्या अपहरणाची तक्रार दाखल होती त्या बापू शिंदे यांना जबाब नोंदविण्यासाठी आज हजर राहण्यास सांगितले होते.
बापू शिंदे यांनी जबाबात काय म्हटलं?
राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार नितीन पाटील आणि काही कार्यकर्त्यांसह बापू शिंदे सोमवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. यावेळी त्यांचा जबाब इन कॅमेरा नोंदवण्यात आला. जबाबात त्यांनी म्हटलंय की, माझे अपहरण झालेले नाही, असे मी लेखी दिले होते. तरीही खोट्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. हे एक प्रकारचे कटकारस्थान आहे. यासंदर्भात तक्रार करणारा माझा मुलगा आहे आणि तो माझ्याजवळ राहत नाही. त्याने दबावाखाली तक्रार दिली असावी.
नितीन पाटील काय म्हणाले?
खासदार नितीन पाटील यांनी देखील पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. ते म्हणाले की, मतदान प्रक्रियेत काही सदस्य सहभागी होऊ नयेत, यासाठी हेतूपूर्वक दोन वेळा गुन्हे दाखल करून संबंधित सदस्यांना अटक करण्यात आली. हा गुन्हा जबरदस्तीने दाखल करण्यात आला असून हे प्रकरण संशयास्पद आहे. पोलीस यंत्रणेचा वापर करून सदस्य फोडण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणामागील मास्टरमाईंडचा शोध घेण्यात यावा. संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, अपहरणाची तक्रार करणारा विकास शिंदे हा बापू शिंदेंचा मुलगा आहे. त्यालाही 24 तास पोलिसांनी ताब्यात ठेवले होते. त्यामध्ये पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आणि संशयास्पद होती. सातारा जिल्हा परिषदेत विशिष्ट राजकीय पक्षाची सत्ता येऊ नये, यासाठी हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप नितीन पाटील यांनी यावेळी केला. निवड प्रक्रियेची वैध बाजू तपासून फेरनिवडीच्या संदर्भाने न्यायालयीन प्रक्रियेत दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
