• Sun. Jun 14th, 2026

    महाराष्ट्र लोक भवन येथे बिहार राज्य स्थापना दिवस साजरा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 23, 2026
    महाराष्ट्र लोक भवन येथे बिहार राज्य स्थापना दिवस साजरा – महासंवाद

    मुंबई, दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र लोकभवन येथे ‘बिहार राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र लोकभवनातर्फे बिहार राज्य स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.

    बिहार ही संस्कृती, अध्यात्म व तत्वज्ञानाची भूमी आहे. या भूमीने देशाला भगवान महावीर व भगवान बुद्ध दिले. भारत आज जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. परंतु त्याहीपेक्षा भारत लोकशाहीची जननी आहे व या लोकशाहीची पाळेमुळे बिहारमधील बुद्ध संघाच्या कार्यप्रणालीमध्ये आहे व त्यामुळे बिहार ही संसदीय परंपरांची जन्मभूमी आहे, असे  प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले.

    बिहार येथील लोक महाराष्ट्रासह देशाच्या विभिन्न राज्यांमध्ये योगदान देत आहेत. मूळचे बिहार येथील अधिकारी आज अनेक राज्यात भारतीय प्रशासकीय सेवा व भारतीय पोलीस सेवेच्या माध्यमातून योगदान देत आहेत. बिहारी लोक देशाच्या सर्व भागात आहेत. त्रिपुरासह देशाच्या उत्तर पूर्व राज्यात देखील बिहारी जनता वसली असून तेथेही ‘छट पूजा’ साजरी केली जाते, आज बिहार समृद्ध इतिहासाची भविष्यातील विकासाची सांगड घालत आहे.

    भारत हा केवळ सीमा, सैन्य व परराष्ट्र धोरण असलेला देश नसून भारत हे संस्कृती व ज्ञान परंपरा असलेले राष्ट्र आहे. देशातील राज्याराज्यांमध्ये विविधता असली तरीही देशात एकात्मतेचा विचार सखोल रुजला आहे असे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बिहारचे लोकनृत्य व भोजपुरी गीत यांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला. या सादरीकरणाबद्दल विद्यापीठाच्या सांस्कृतिक चमूचे अभिनंदन करताना बिहारच्या गीत, नृत्य व संगीतात जोश आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (से.नि.) सय्यद अता हसनैन यांचा संदेश व्हिडिओच्या माध्यमातून दाखविण्यात आला. बिहार राज्याची समग्र माहिती देणारी चित्रफीत देखील यावेळी दाखवण्यात आली.

    या सांस्कृतिक कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मिथिला प्रदेशाचे लोकनृत्य झिझिया व जट-जटिन सादर केले तसेच एक भोजपुरी गीत देखील सादर केले.

    राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक केले तर शिक्षण शाखेतील कक्ष अधिकारी वंदना मोरमारे यांनी आभार प्रदर्शन केले.

    मुंबई विद्यापीठाचे  कुलगुरु प्रो. रविंद्र कुलकर्णी व प्रकुलगुरु प्रा. अजय भामरे यांनी राज्यपालांचा सत्कार केला.

    कार्यक्रमाला राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. सुनील पाटील, सांस्कृतिक कार्यक्रमांचे समन्वयक निलेश सावे, विद्यापीठाचे विद्यार्थी तसेच लोकभवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    0000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed