सांगलीच्या पलूस येथे एका शिक्षण संस्थेच्या संचालकांचा चार दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचं गूढ उकललं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगलीच्या पलूस येथील एका नामांकित शिक्षण संस्थेचे संचालकाच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या एका दिवसात गुन्ह्याचा छडा लावत, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. किरकोळ वादातून त्याने संजय प्रभाकर परांजपे यांची हत्या केल्याचा आता उघडकीस आले आहे. 18 मार्च रोजी संजय परांजपे यांची पलूसमध्ये धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केल्याचा प्रकार घडला होता. परांजपे राहत असलेल्या घराच्या पार्किंगमध्ये एका अल्पवयीन मुलाशी किरकोळ वाद झाला ज्यातून मुलाने परांजपे यांना ढकलून दिल्यानंतर खाली पडल्याने परांजपेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर ही बाब परांजपे सांगतील या भीतीपोटी, मुलाने टोकदार शस्त्रांनी,परांजपे यांच्यावर हल्ला करून खून करत पळ काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पलूस येथील खाजगी सावकार आणि शिक्षण संस्था संचालक संजय प्रभाकर परांजपे (वय ६१ रा. परांजपे वाडा, पलूस) यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी कोणताही पुरावा हाती नसताना तांत्रिक माहितीच्या आधारे एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. परांजपे यांच्याशी तात्कालिक कारणातून झालेल्या वादात धारदार हत्याराने त्यांचा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
पोलिसांनी नेमकी कारवाई कशी केली?
पलूस शहरात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे यांची अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घुसून त्यांची निर्घृण हत्या केली होती. घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने स्थानिक गुन्हे अन्वेषणला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार एक पथक तयार करण्यात आले. घटनास्थळावर कोणताही तांत्रिक किंवा भौतिक पुरावा उपलब्ध नव्हता.
खुनानंतर दोन दिवस पोलिसांनी मृत परांजपे यांचे सावकारीचा व्यवसाय, शिक्षण संस्था आणि इतर संबंध या अनुषंगाने तपास केला. मात्र, पोलिसांच्या हाती काही लागले नाही. यावेळी पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीवर जोर दिला. यावेळी सदरचा गुन्हा हा एका अल्पवयीन मुलाने केला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने त्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सांगितले की, मृत परांजपे यांच्याशी बुधवारी गणेश सदन अपार्टमेंटमध्ये किरकोळ कारणातून वाद झाला. यावेळी त्याने संजय परांजपे यांना जोरात धक्का दिल्याने ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव होऊ लागला. यावेळी परांजपे उठून सदर घटनेबाबत इतर कोणाला तरी सांगतील या भीतीने हत्याराने तोंडावर, गळ्यावर, डोक्यात आणि मानेवर वार करून त्यांचा मोबाईल घेऊन गेल्याचे सांगितले. यावेळी त्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेत पोलिसांनी मोबाईल जप्त केला.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा