• Sun. Jun 7th, 2026
    Accident News : मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात; बेफाम वेगात वळण घेणाऱ्या कारने दुचाकीला उडवलं, पेणमघील निष्पाप तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

    मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पेणमधील आंबिवली गावच्या हद्दीत कारने दुचाकीला चिरडले आहे. ही घटना गुढीपाडव्याच्या दिवशी घडली आहे.

    गुढीपाडव्याच्या दिवशी पेणमधील तरुणाचा अपघातात मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : पेण तालुक्यातील आंबिवली गाव हद्दीत मुंबई–गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. अतिवेग, निष्काळजीपणा आणि नियंत्रण सुटलेले वाहन यांचा संगम झाल्याने एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला. गुढीपाडव्याच्या दिवशीच काळाने झडप घालत या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    नेमकं काय घडलं?

    दि. १८ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास आंबिवली गावाच्या हद्दीत नवीन साई सहारा हॉटेलसमोर हा अपघात घडला. अक्षत बाबूलाल राठोर (वय ३५, रा. जेएनपीटी टाउनशिप, उरण) हा त्याच्या ताब्यातील एक्सएल ६ कारने पेणहून पनवेलकडे जात असताना अतिवेगात वळण घेत होता. वेगावर नियंत्रण सुटल्याने त्याने निष्काळजीपणे वाहन चालवत उजव्या बाजूने जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार शुभम देविदास पाटील (वय २७, रा. आंबिवली, ता. पेण) गंभीर जखमी झाला.

    गंभीर दुखापत

    या अपघातात शुभमच्या डोक्याला तसेच हातापायांना गंभीर दुखापती झाल्या. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र मृत्यूशी झुंज देताना अखेर गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका क्षणाच्या चुकीमुळे एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

    Maharashtra TimesPune Crime : ‘वस्तीत का फिरता?’ किरकोळ वादाचा राग, कोयता गँगकडून कुटुंबावर हल्ला; पाच जणांना अटक

    गुन्हा दाखल

    या प्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात गु.रजि.नं. ११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून पोलीस उपनिरीक्षक अनिल शंकर पाटील यांनी तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती दादर पोलिसांनी आज सायंकाळी दिली आहे.

    वेगावर नियंत्रण आवश्यक

    दरम्यान, मुंबई–गोवा महामार्गावरील वाढते अपघात आणि बेदरकार वाहनचालकांचा कहर यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई आणि वेगावर नियंत्रण आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा