संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यावरुन जोरदार निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी केलेला दावा खरं आहे ते सांगावं, असं आव्हान संजयकाका पाटील यांनी केलं आहे.
संजय काका पाटील काय म्हणाले?
“सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केलं. संजय काकांना भाजपच्या बैठकीला आम्ही पाठवलं होतं आणि ते आम्हाला माहिती देत होते, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं. पण जयंत पाटील यांना माझं सांगणं आहे की, मी तुम्हाला आयुष्यात कधी माझा नेता मानला नाही आणि मानायची वेळही येणार नाही. पण तुम्ही पोरकटपणाने जे वक्तव्य केलं आहे, जिल्ह्यामधील माणसं राजकारण जवळून पाहतात. तुम्ही कितीवेळा भाजपमध्ये येण्यासाठी उंबरे झिझवले त्याचा संजय पाटील देखील साक्षीदार आहे”, असं संजयकाका पाटील म्हणाले.
‘मला क्रमश: काही गोष्टी काढाव्या लागतील’
“तुम्ही कुणाकुणाशी बोलता, कसं अंडस्टॅडिंगचे राजकारण खेळता, आपल्या तालुक्यातच तुमचं कसं राजकारण आहे, एकाच गावातले दोन गट एकमेकांच्या विरोधात लढवायचे आणि आपली राजकीय पोळी भाजायची या सगळ्या बाबी आणि आपला इतिहास मला काढायला लावू नका. तुम्ही तुमच्या इथून दोन माणसं, संजय पाटील चार माणसं बरोबर घेऊन आला, त्याचा राग म्हणून तुम्ही माझ्याशी भांडायला पाहिजे होतं. पण तुम्ही काहीतरी कुचके राजकारण करण्याची भूमिका दाखवली आहे. यापुढे हे थांबलं नाही तर मला क्रमश: काही गोष्टी काढाव्या लागतील. एवढाच माझा तुम्हाला इशारा आहे”, असा मोठा इशारा संजयकाका पाटील यांनी दिला.
“आमची अडचण करावी हाच त्यांचा हेतू होता. माझ्यासारखा माणूस एकाकी पडला होता. मी लढलो. मला साथ दिली. नगरपालिका, नगरपंचायत आली, बहुमत आणले. लोकांनी मला दिलेली शक्ती आहे. त्यामुळे मला असं दिवसा वेगळं आणि रात्री वेगळं, अंडरस्टँडिगचे राजकारण करावं, हे मी कधी केलं नाही. तुम्ही माझ्यावर आक्षेप घेताय. माझ्या राजकारणावर अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. लोक शहाणे असतात. लोक ओळखतात. पण तुम्हाला मी या निमित्ताने इशारा देतोय”, असाही इशारा संजयकाका पाटील यांनी दिला.
‘जयंत पाटलांचं वक्तव्य चुकीचं’
“मी मागणी केली होती की, आम्हाला आमच्या अजित दादा गटाला अध्यक्ष पद द्या. अजित दादांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे अजित दादांच्या राष्ट्रवादीला अध्यक्षपद दिलं तर ती खरी श्रद्धांजली ठरेल. पण आदल्यादिवशी ही प्रक्रिया झाली. तिथून आम्ही उठून आलो. यानंतर मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिणींचा फोन आला. असं करु नका, आपल्याला महायुती म्हणून निर्णय घ्यायचा आहे, असं आवाहन त्यांनी केलं. अडचणीच्या काळात जो माणूस मदतीला येतो तो खरा मित्र असतो. त्यामुळे मी निर्णय घेतला. मला माहिती आहे. माझ्यासोबत दोन जण आले. बाकीचे आता आले नाहीत. त्यांचं काय बोलणं झालं, तो विषय मला घ्यायचा नाही. मला कुणाचे नुकसान करायचं नाही. पण ज्या पद्धतीने जयंत पाटलांनी वक्तव्य केलं ते अतिशय चुकीचं आहे”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.
“इथे वर्चस्व संपवण्याचा शंभर टक्के प्रयत्न आहे. पुढचं आज बोलत नाही. जयंत पाटलांनी मुलगा प्रतीक पाटील यांच्या डोक्यावर हात ठेवावा आणि संजय पाटलांनी आपल्याला मदत केली हे सांगावं. खोटं बोलून कुचकं राजकारण करत आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.
