• Wed. Jun 17th, 2026
    Prakash Ambedkar : ‘सब चंगा सी’चा दावा फोल, पेट्रोलियम क्षेत्रावर ‘एस्मा’ का?’; गॅस तुटवड्यावरुन प्रकाश आंबेडकरांची मोदी सरकारवर टीका

    prakash ambedkar slams pm modi govt over gas shortage iran israel war impact on india esma

    प्रकाश आंबेडकर यांची मोदी सरकारवर टीका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मध्य पुर्वेतील इराण-इस्त्रायल युद्धामुळे जागतिक पटलावर तणाव वाढला असतानाच, त्याचे थेट पडसाद भारताच्या ऊर्जा क्षेत्रावर उमटले आहेत. केंद्र सरकारने पेट्रोलियम क्षेत्रावर ‘एस्मा’ (ESMA) लागू केल्याने देशातील गॅस टंचाईचे संकट गडद झाले असून, यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. “दोन दिवसांपूर्वी सर्व काही ठीक असल्याचे सांगणारे सरकार आता पेट्रोलियम क्षेत्रावर ‘एस्मा’ (ESMA) का लावत आहे?” असा सवाल करत त्यांनी मोदी सरकारचा ‘सब चंगा सी’चा दावा फोल ठरल्याचे एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

    ‘आत्मनिर्भरते’वर टीका

    अनेक वर्षांपासून ‘आत्मनिर्भरते’चा जप करणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात नैसर्गिक वायू साठवणूक आणि पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढणार हे स्पष्ट असतानाही भारताने अल्जीरिया, ऑस्ट्रेलिया किंवा नॉर्वे यांसारख्या पर्यायी देशांकडून गॅस आयातीचे नियोजन का केले नाही? असा प्रश्न त्यांनी या पोस्टमध्ये उपस्थित केला आहे. केवळ युद्धाची ठिणगी पडल्यावरच सरकारला जाग आली, ही देशाच्या ऊर्जा सुरक्षेची मोठी हार असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

    मध्यमवर्गीय आणि गरिबांना फटका

    दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या मते, या इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका सामान्य जनतेला बसणार आहे. गॅस पुरवठ्यावर निर्बंध आल्यामुळे छोटे-मोठे ढाबे, रेस्टॉरंट आणि संपूर्ण हॉस्पिटॅलिटी सेक्टर अडचणीत आले आहे. “पंतप्रधान मोदी आणि हरदीपसिंग पुरी यांनी या व्यावसायिकांच्या रोजगारावर आणि पर्यायाने पोटावर लात मारली आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे. केवळ हॉटेलच नव्हे, तर लग्नसराईतील केटरिंग सेवा, एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षा-टॅक्सी आणि खत निर्मिती उद्योगालाही याचा फटका बसणार आहे. खत टंचाईमुळे शेतीचे उत्पादन घटून भविष्यात अन्नधान्य महाग होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

    Maharashtra TimesIran US Israel war: अमेरिकेविरुद्ध युद्धात इराणचा पहिला विजय! दक्षिण कोरियातून ‘थाड’ काढण्याची वेळ; देशात संताप

    सीएनजीवर अवलंबित्व धोक्याचे

    सरकार सध्या सीएनजीला प्राधान्य देत असले तरी, हा संघर्ष लांबल्यास सीएनजीवर अवलंबून असलेले भारतातले उद्योग कोलमडून पडतील, असा इशाराही त्यांनी दिला. “स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी धावपळ करणाऱ्या मोदींनी भारताच्या मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले आहे,” अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा संताप व्यक्त केला.

    Maharashtra TimesNashik Honey Trap: सोशल मीडियावरचं ‘प्रेम’ 53 लाखांना; व्यावसायिकासोबत मोठा हनी ट्रॅप, घटनेनं पोलिसही चक्रावले

    दरम्यान, ऊर्जा सुरक्षेसाठी दीर्घकालीन आणि ठोस धोरणाची आवश्यकता असल्याचेही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी अधोरेखित केले आहे. या संकटामुळे येत्या काळात महागाईचा मोठा भडका उडण्याची शक्यता असून, विरोधकांनी आता या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा