रायगडमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. येत्या 11 मार्चला जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. तर 12 मार्चला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.
पंचायत समिती सभापती पदासाठी विविध पक्षांकडून इच्छुकांची चाचपणी सुरू असून सदस्यांमध्ये हालचालींना वेग आला आहे. बहुमताचे गणित जुळविण्यासाठी पक्षांच्या नेत्यांकडून बैठकांचे सत्र सुरू आहे. काही ठिकाणी एकापेक्षा अधिक इच्छुक असल्याने पक्षांतर्गत चर्चाही रंगू लागल्या आहेत. त्यामुळे पंचायत समिती स्तरावरही सत्तेसाठी चुरस निर्माण झाली आहे. सभापती पदाच्या निवडीनंतर पंचायत समित्यांमधील पुढील कामकाजाची दिशा ठरणार असल्याने या निवडीकडे स्थानिक राजकारणाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, १२ मार्च रोजी होणाऱ्या रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद हे ग्रामीण विकासाचे महत्त्वाचे केंद्र मानले जात असल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडीत कोणत्या पक्षाच्या सदस्याला नेतृत्वाची संधी मिळते आणि जिल्हा परिषदेची धुरा कोणाच्या हाती जाते याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
या निवडीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक प्रमुख नेतेही रायगडमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, मंत्री आशिष शेलार, प्रवीण दरेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, आमदार रविशेठ पाटील तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी या निवडीवेळी उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या निवडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर अलिबाग समुद्रकिनारी भाजप-राष्ट्रवादी महायुतीचा विजयी मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मेळाव्यासाठी सुमारे पाच हजार कार्यकर्ते बसू शकतील, असा मोठा मंडप उभारण्याचे कामही सुरू आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
पंचायत समिती सभापती तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष या दोन महत्त्वाच्या निवडी सलग दोन दिवसांत होत असल्याने रायगड जिल्ह्यातील राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडीनंतर जिल्ह्यातील सत्तेची समीकरणे कोणत्या दिशेने वळतात आणि नेतृत्वाची धुरा कोणाच्या हाती जाते? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
